राजेश भोस्तेकर
रायगड : मोबाईल (Mobile) ही सध्याच्या युगात खूप गरजेची वस्तू झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट, नवीन ऍप याचा काळजीपूर्वक मोबाईलद्वारे उपयोग केल्यास तो लाभदायक ठरू शकतो. मात्र दुर्लक्ष केल्यास आपण फसलो जाऊन सायबर गुन्ह्यांचे (Cyber Crime) शिकार ठरू शकता हे मात्र नक्की. रायगड (Raigad) जिल्ह्यात 2017 ते 2021 या पाच वर्षात 13 कोटी 36 लाख 71 हजाराची फसवणूक सायबर गुन्ह्याद्वारे नागरिकांची झाली आहे. ही गंभीर बाब असून सायबर गुन्हे रोखण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी सायबर साक्षर सुरक्षित गाव ही संकल्पना तयार केली आहे.
प्रायोगिक तत्वावर अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील झिराड हे पहिले सायबर साक्षर सुरक्षित गाव ठरले आहे. कोकण परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते या अभियानाची सांगता झिराड येथे झाली.
हे देखील पहा-
सायबर गुन्ह्यांची दिवसेंदिवस वाढ;
मोबाईलवर मेसेज पाठवून लॉटरी लागली, ओटीपी मागून, सोशल मीडियावरील माहितीचा दुरुपयोग करून पैसे उकळणे असे गुन्हे हे सायबर गुन्हे म्हणून ओळखले जातात. अनेक जण अशा फसव्या जाहिराती, मेसेजला फसून सायबर गुन्ह्याचे बळी पडतात. मोबाईल हा उपयुक्त आहे तेवढाच तो घातकही आहे. त्याचा वापर हा हल्ली प्रलोभनांना बळी पाडण्यासाठी होत आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यातही सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेल्याची संख्या अधिक आहे. यामध्ये मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे वाढलेले होते. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी जिल्हा सायबर गुन्हेमुक्त करण्यासाठी पावले उचलली आहेत.
'या' गावाची प्रायोगिक तत्वावर निवड;
अशोक दुधे यांनी सायबर साक्षर सुरक्षित गाव ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील झिराड या गावाची प्रायोगिक तत्वावर निवड केली आहे. मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजीव पाटील यांनी गेल्या दीड महिन्यापासून झिराडसह परिसरात सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती करीत आहेत. गावात विद्यार्थ्यांना घेऊन रॅली, पथनाट्य, बैठका, सभा घेऊन नागरिकांमध्ये सायबर साक्षर गाव करण्यासाठी जनजागृती करीत आहे. त्यामुळे झिराड गावात सायबर गुन्हे रोखण्यात मांडवा सागरी पोलीस हे यशस्वी झाले आहेत.
...हे सायबर गुन्हे आपण रोखू शकतो;
जिल्ह्यात ही संकल्पना गावागावात राबविण्यात येणार असल्याने यामुळे जनतेत सायबर गुन्ह्याबाबत जागृती होऊन सायबर गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश येणार आहे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात नागरिकांची सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून 13 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर गुन्हे करणारे गुन्हेगार हे अनेक वेळा सापडत नाहीत. फेक कॉल, संदेश, लॉटरी लागणारे मेसेज, बँकेचे फेक मेसेज याबाबत नागरिकांनी स्वतःच काळजी घेतली तर हे गुन्हे आपण रोखू शकतो. त्यामुळे पालकांनी सायबर साक्षर होणे हे सर्वात महत्वाचे आहे. नागरिकांनी प्रलोभनापासून सावध रहा, असे आवाहन संजय मोहिते यांनी केले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.