फुलवळ ( ता. कंधार ) : आठ जून रोजी सूर्याचा गाढव वाहन घेऊन मृग नक्षत्रात प्रवेश झाला आणि खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरणीला सुरुवात करण्यासाठी बळीराजा सज्ज झाला. परंतु मृग नक्षत्रात म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने यंदा पेरण्या थोड्या उशिराच सुरु झाल्या. त्यानंतर ता. २१ जून रोजी सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात कोल्हा वाहन घेऊन प्रवेश झाला आणि शेवटी शेवटी बऱ्यापैकी पाऊस पडला. पण ता. ५ जुलै रोजी उंदीर वाहन घेऊन सूर्याचा पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश झाला आणि चांगल्या पावसाला सुरुवात झाली. रविवारी ता. १० जून रोजी तर दुपारनंतर तब्बल दीड ते दोन तास धुवाधार बॅटिंग करत पावसाने कहरच गाठला.
गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा काळ्या आईची ओटी भरुन पावसासाठी आभाळाकडे नजरा लावून देवा दुबार पेरणीचे तर संकट आमच्यावर येणार नाही ना ? या चिंतेत प्रत्येक शेतकरी होता. परंतु आज आषाढ महिन्याच्या प्रारंभीच्या दिवशी झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला असून पांडुरंगाने शेवटी आमचे गाऱ्हाणे ऐकलेच अशा समाधानात आनंदाने भारावून गेले होते.
झालेल्या पावसाने मात्र रस्ते, नाल्या यांची चांगलीच वाट लागली असून राष्ट्रीय महामार्ग बनवण्यासाठी खोदून ठेवण्यात आलेल्या रस्त्यावर व रस्त्यालगत ओढ्याना पुराचे स्वरुप आले होते. त्या रस्त्यावरुन पायी चालणे, मोटारसायकल चालवणे जिकरीचे झाले आहे. पावसाचा वेग आणि गाराडून आलेले आभाळ पाहून वाहनधारकांना भर दिवसा गाड्यांच्या लाईट लावून वाहन चालवावे लागत होते.
सदर रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण झाले नाही तर येणाऱ्या काळात आणि याच पावसाळ्यात किती अपघात होतील हे न सांगितलेलेच बरे, तेंव्हा संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.