सांगली जिल्ह्यात सध्या शेअर्स, डॉलरमध्ये गुंतवणुकीचा भूलभुलैय्यातून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखविले जाते आहे. यात अनेकांना लाखो रुपयांचा गंडा बसला आहे. ‘व्याजाला भुलले अन् मुदलाला मुकले’ अशी बिकट अवस्था अनेक गुंतवणूकदारांची झाली आहे. याबाबत जिल्ह्यातील बँकिंग व अर्थतज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. कोणत्याही आर्थिक संस्थेला 15 ते 20 टक्के परतावा देणे शक्य नाही, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.
अलिकडे मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल आहे. यासाठी मोठा गाजावाजा केला जात आहे. यामध्ये लोकांपुढे केवळ गुंतवणूक करून लाखो रुपये मिळवणार्यांची फक्त उदाहरणे येत आहेत. दुर्दैवाने यामध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेल्यांची उदाहरणे समोर येत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत केंद्र सरकारची अशा प्रकारच्या गुंतवणुकीला अधिकृत मान्यता मिळत नाही. तोपर्यंत सर्वसामान्य ग्राहकांनी यामध्ये गुंतवणूक करणे उचित नाही. त्यामुळे सामान्य ग्राहकांनी नादी लागू नये असे आव्हान अॅड. किशोर लुल्ला यांनी केले आहे.
सध्या जिल्ह्यात काही आर्थिक संस्थांकडून एक लाखाला पाच ते दहा टक्के दरमहा परतावा देण्याची योजना सुरू आहे. आत्तापर्यंत अशा कोणत्याही योजना यशस्वी झालेल्या नाहीत. त्यामुळे कित्येक लोकांचे पैसे बुडालेले आहेत. आज कोणत्याही को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये पैसे गुंतवले तर त्या ग्राहकाला एक लाख ते पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण आहे. को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये कमी व्याज मिळते म्हणून लोक जादा व्याजाच्या अमिषापोटी अशा योजनांमध्ये पैसे गुंतवतात आणि एक दिवस फसतात. नागरिकांनी आता तरी बळी पडणे थांबवावे.
जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घालणार्या अनेक संस्था बाजारात येत आहेत. वास्तविक पाहता 1 टक्के ते 7 टक्क्यांपर्यंत परतावा देणार्या शासकीय नियमांचे पालन करून काम करणार्या काही संस्था आहेत. त्यांच्या काहीही तक्रारी नाहीत. परंतु 15 टक्क्यांवर परतावा देणार्या संस्था असतील तर त्या हमखास फसवणूक करणार्या आहेत, असे समजावे. ज्यांना कोणीही बँका कर्ज देत नाहीत, अशा लोकांना या संस्था कर्ज देत असतात. त्यांचे धंदे बुडाले की संस्था या अडचणीत येणारच. याबरोबरच आता ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही वाढलेले आहेत. स्वतः कोणतीही खात्री न करता ऑनलाईन गुंतवणूक केली जाते अन् फसवणूक होते. संबंधितांवर कारवाई करता येत नाही. त्यामुळे अशा फसवणुकीला बळी पडू नये. माजी महापौर व सांगली क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले.
सध्या शेअर मार्केटच्या नावाखाली ठेवीदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून गंडविण्याचे प्रकार वाढले आहेत. जादा व्याजाच्या हव्यासापोटी अनेकांनी आपल्या ठेवीवरच पाणी सोडले आहे. जिल्ह्यात असे अनेक प्रकार घडले आहेत. कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून अनेक दलालांनी पलायन केले आहे. अशा दलालांच्या नादाला ठेवीदारांनी लागू नये. विश्वासाहर्र्ता असलेल्या बँकांमध्येच गुंतवणूक करावी. ठेवीदारांनी आपण जेथे गुंतवणूक करतो त्या संस्थेची पार्श्वभूमी, सर्व चौकशी करूनच पैशांची गुंतवणूक केली पाहिजे. नंतर पश्चातापाची वेळ येऊ नये. जादा व्याजाचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक झाली आहे. मात्र बदनामीला भिऊन काहीजण त्याची बोलत नाहीत.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.