
Buldhana News: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील नेते आणि आमदारांमध्ये सर्वकाही ठिकठाक असल्याचा दावा केला जात असला तरी सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये धुसफुसीच्या चर्चा समोर येत आहेत. राज्यात नवं सरकार स्थापन होवून सात महिने झाले तरी मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे.
शिंदे गटातील आमदारांची नाराजी अनेकवेळा समोरही येऊनही विस्तार होताना दिसत नाही. सत्ताधारी आमदारांमधील ही धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आलीय. नुकतीच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत अमरावतीच्या जागेवर भाजप आमदार रणजित पाटील यांचा पराभव झाला. या पराभवानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपने आपल्याला विश्वासात घेतले नाही असा आरोप केला आहे.
रणजित पाटील यांच्या पराभवावरुन शिंदे गटाच्या आमदाराने भाजपवर गंभीर आरोप केलाय. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमच्या पक्षाचे दोन आमदार असूनही आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही असा आरोप केला आहे. शिंदे गटाला विश्वासात न घेतल्यामुळे भाजपच्या रणजित पाटील यांचा पराभव झाला, असा स्पष्ट दावा गायकवाड यांनी केलाय.
आमदार संजय गायकवाड म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार आणि खासदार आहेत. आम्हाला कुणाला विश्वासात घेतलं गेलं नाही. तसेच आमच्याकडे एवढी मोठी कार्यकर्त्यांची फळी आहे, त्यांना देखील विश्वासात घेतलं गेलं नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
संजय गायकवाड यांनी सांगितले की, आम्ही महिन्याभरापूर्वी मतदार याद्या मागितल्या होत्या, पण त्या मतदानाच्या चार दिवसआधी मिळाल्या. त्यामुळे मतदारांपर्यंत फार कुणी गेलं नाही. आम्ही जिल्ह्यामध्ये सहज मते फिरवू करु शकलो असतो. पण दुर्देवाने आमच्या लोकांना फार विश्वास घेतलं गेलं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
शिंदे गटाच्या आमदारांनी आधीही व्यक्त केलीय नाराजी
विशेष म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही. आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही यावरुन जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. बच्चू कडू यांनी देखील मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन नाराजी व्यक्त केलीय. आता संजय गायकवाड यांनी देखील जाहीरपणे नाराजी बोलवून दाखवली आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच - मंत्री संदिपान भुमरे
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणे गरजेचे असून अधिवेशनापूर्वी तो होईल असा आशावाद रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी आज व्यक्त केल्याने इच्छुक आमदारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. रोहयो मंत्री संदीपान भुमरे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निकालामधून नाराजी दिसत नाही. या निवडणुकीत मोजके मतदान असते. असे भुमरे म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.