लातूर: शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी लातूर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे आणि अमित देशमुख यांच्यावर बोचरी टीका केली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका करताना सावंत यांनी जीभ घसरली, 'येड्याचा झटका आल्यासारखं हे उठले आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले' असं वक्तव्य सावंत यांनी केलं आहे.
सावंत म्हणाले, शिवसेना संपवत राज्यात राष्ट्रवादीबरोबर आणि लातूरमध्ये देशमुखांबरोबर संधान साधलं. हाल अपेष्टा सोसणाऱ्या शिवसैनिकांना (Shivsainik) जय महाराष्ट्र केला. त्यांना त्यांची जागा दाखवणार, देशमुख यांनी आता रस्त्यावर उतरत राजकारण करून दाखवावं असा आव्हानही सावंत यांनी यावेळी केलं.
पाहा व्हिडीओ -
तत्कालीन पक्षप्रमुखांनी लातूरची (Latur) शिवसेना गढीच्या दावणीला बांधली होती. अशा गढ्या उध्वस्त करण्याची आम्हाला सवय आहे. लातूर येथील शिवसैनिकांनी अतिशय हाल सोसत दिवस काढले. मात्र, त्यावेळेच्या पक्षप्रमुखांनी कायमच देशमुखांबरोबर राहत शिवसेना वाढू दिली नाही. आता असं होणार नाही.
कारण मैदानात तानाजी सावंत आहे, बाळासाहेबांचे विचार घेऊन काम करणारी ही शिवसेना आता नवीन पद्धतीने काम करणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. तसंच 2019 ला भाजप आणि शिवसेनेने युती करत निवडणूक लढवली, जनतेने युतीला भरभरून मतदान केलं. सत्तेचा कौल दिला.
असं असताना अचानक येड्याचा झटका आल्यासारखं हे उठले आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले, संपूर्ण मतदारांचा घोर अपमान केला, असं नाव न घेता सावंत यानी उद्धव ठाकरेंवर खालच्या शब्दात टीका केली. तर 95 ते 2000 या काळात शिवसेना भाजपाची सत्ता होती बाळासाहेबांना त्यावेळेस वाटलं नसेल का की आपल्या मुलाला मुख्यमंत्री करावं पण त्यांनी केलं नाही कारण विचार महत्त्वाचा होता असंही सावंत यावेळी म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.