औरंगाबाद: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता राज्यात शिंदे गट आणि भाजप एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. शिवसेनेने बंडखोर आमदारांविरोधात सर्वाच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे गटातील आमदारांसंदर्भात एक गौप्यस्फोट केला आहे.
'जे लोक शिंदे गटात गेले आहेत, ते परत येण्यासाठी आमच्याशी संपर्कात साधत आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेना औरंगाबाद जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. माझा भगवा माझी शिवसेना या योजनेविषयी माहिती देताना ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
'जे लोक गेलेले आहेत तेच गेले आहेत, आता नवीन कुणीही जाणार नाही. त्यामुळे हा विषय इथेच संपला आहे. तसेच तीन सदस्य प्रभाग रचनेची भीती भाजपला (BJP) वाटत होती, म्हणूनच प्रभागरचनेचा निर्णय रद्द केला, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला.
दरम्यान, आज शिवसेनेच्या याचिकांवर सर्वाच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोर्टाने दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता पुढील सुनावणी येत्या सोमवारी म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांना एक मोठा दिलासा दिला आहे. (Shivsena Latest News)
आजच्या सुनावणीत शिवसेनेच्या निवडणूक आयोगासमोर असलेल्या प्रकरणाचा मुद्दा समोर आला. निवडणूक आयोगाच्या वतीने दातार यांनी बाजू मांडली. यावेळी दातार यांनी 'कोणताही पक्ष निवडणूक आयोगाकडे जेव्हा धाव घेतो, तेव्हा खरा कुणाचा यावर निर्णय घेणं हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असून, आम्ही कागदपत्रं मागितली आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे वेगळी आहे." असं सुप्रीम कोर्टात सांगितलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.