जालना : मुंबईत पहिल्या डोसचे आज 100 टक्के लसीकरण पूर्णत्वास जात असून मुंबईतील नागरीकांनी लसीकरणास प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचं अभिनंदन तसेच आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच अभिनंदन अशा शब्दात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईकरांचं अभिनंदन केल आहे. सध्या प्रत्येक जिल्ह्यात लसीकरण वेगाने होत असून मिशन कवचकुंडल आणि दत्तक घर घर मोहिमेअंतर्गत लसीकरण सुरू असून घरा घरात जाऊन समजावून सांगून नागरीकांना लसीकरणासाठी प्रयत्न सुरु आहे.
राज्यात 7 कोटींपेक्षा अधिक लोकांनी पहिला डोस, तर 3 कोटी पेक्षा अधिक लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. आता राज्यात पहिल्या डोसचं लसीकरण नोव्हेंबर अखेरपर्यंत संपलं पाहिजे हे आरोग्य विभागाचं टार्गेट असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे. हे आव्हानात्मक काम असून जिल्हाधिकाऱ्यांना अश्या प्रकारचे आदेश देण्यात आल्याचं देखील टोपे म्हणाले.
काही जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाला वेग देण्यासाठी कडक निर्बंध घातले आहेत. कायद्याने लसीकरण हे बंधनकारक नक्कीच नाही पण मानवजातीच्या सुरक्षिततेसाठी हे लसीकरण गरजेचं आहे असंही टोपे यांनी म्हटलं आहे. जगभरात लसीकरणाला महत्व असून लसीकरणासाठी नागरीकांना समजावून सांगणे हे आम्ही मिशन मोडवर करत असून जे लोक विरोध करत आहे त्यांना समजावून सांगत असल्याचं देखील ते म्हणाले.
हे देखील पहा :
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज प्राध्यापकांना लसीकरण करणं बंधनकारक करणार असून लसीकरण न केलेल्या प्राध्यापकांना सुविधा दिल्या जाणार नसल्याचं म्हटलं आहे. यावर देखील टोपे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांचा हेतू चांगला असून त्यांनी चांगल्या हेतूनेच ते वक्तव्य केल्याचं देखील टोपे म्हणाले. प्राध्यापकांनी लसीकरण केलंच पाहिजे असही त्यांनी सांगितलं. दिवाळीनंतर पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी चिंता करण्यासारखं त्यात काही नाही असंही त्यांनी सांगितलं.
युरोपमध्ये पाचवी लाट आली असून भारतात अजून तिसरी देखील लाट आली नाही. याबाबत देखील टोपे यांनी भाष्य केलं आहे. आपल्याकडे 80-85 टक्के लसीकरण झालं असून त्यामुळे अँटीबॉडीज वाढल्या आहे. जास्त लसीकरण झालं आणि डेल्टा व्हायरस हाच आज आपल्या देशात आढळतो. दुसरा जोपर्यंत म्युटेशन होत नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेचा धोका नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. डेल्टा व्हायरसवर आपल्या लसी प्रभावी आहेत असंही ते म्हणाले. तिसरी लाट आली तरी सौम्य राहील असंही त्यांनी सांगितलं आहे.
मुंबईत विषाणूजन्य आजारात वाढ झाली आहे. हा आजार श्वसनाशी संबंधीत व्हायरस मुळे होत असल्याचं निदान तज्ज्ञांनी केलं आहे. यावर देखील टोपे यांनी भाष्य केलं. हा व्हायरस असला तरी तो कोरोना नाही. या आजाराची गंभीरता जास्त असणार नाही असेही ते म्हणाले.
कोरोना संकट कायम असताना केरळमध्ये नोरोव्हायरसनं शिरकाव केला आहे. याबाबत आपण तज्ज्ञांशी चर्चा केली असून याची फार गंभीरता नाही. हा व्हायरस रूटीनमध्ये आढळत असून त्याला फार गंभीर्याने घेण्याची गरज नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबई महापालिकेने कोरोना विषाणूचे प्रकार शोधण्यासाठी चौथ्या जनुकीय चाचणीचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. यात लसीकरण झालेल्या एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचं समोर आलं आहे. हा निष्कर्ष कदाचित मुंबईपुरता असण्याची शक्यता असून काही नागरीकांना दोन लस देऊनही इन्फेक्शन होऊन काही नागरिकांचा मृत्यू झाल्याचे ते म्हणाले. तशा तुरळक केसेस आढळून आल्याचं देखील टोपे म्हणाले. या केसेसमध्ये वृद्ध आणि काही आजार असलेल्या नागरिकांचा समावेश असल्याचं देखील ते म्हणाले.
चंद्रपूर महापालिकेने लसीकरण वाढवण्यासाठी नागरीकांना लस घ्या टीव्ही, फ्रिज वाशिंग मशीनची ऑफर दिलीय. ही ऑफर कौतुकास्पद आहे. लसीकरण वाढवण्यासाठी महापालिकेची ऑफर चांगली असून हे अनुकरणीय आहे असंही ते म्हणाले.
कोविशिल्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर 84 दिवसांचं आहे. हे अंतर 28 दिवसांवर आणण्यासाठी केंदीय आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केला असून लसीकरण वेगाने करण्यासाठी हे अंतर कमी करण्याची गरज आहे. अशी मागणी केंद्रीय आरोग्य विभागाकडे केल्याच देखील टोपे यांनी सांगितलं.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.