औरंगाबाद : बारावे ज्योतिर्लिंग असलेले वेरुळचे घृष्णेश्वरही आता कोर्टात पोहचले आहेत. कारण बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरावर (Grishneshwar Temple) मालकी कोणाची यावर वाद सुरू झाला आहे. पुजारी, ट्रस्ट आणि पुरातत्व खाते या तिघांनीही घृष्णेश्वर मंदिर आणि शेतजमिनीवर आपली मालकी असल्याचा दावा केला आहे.
जगभरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आणि बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरावर मालकी कोणाची यावर आता वाद सुरू झाला आहे. हा वाद आता औरंगाबाद खडपीठात पोहचला आहे. मंदिराच्या मालकीवर पुजारी, ट्रस्ट की पुरातत्व खाते यापैकी कोणाची मालकी आहे, यासाठी खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हा न्यायालयाने मंदिर आणि शेतजमिनीवर पुजाऱ्याचा ताबा असल्याचा निर्णय दिला होता. मात्र, पुरातत्व खात्याने या निर्णयाला आव्हान देत घृष्णेश्वर मंदिर आणि शेती ही पुरातत्व खात्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या (High Court) औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठात पोहचला आहे. (Joytirliagam Grishneshwar Temple Latest News)
घृष्णेश्वर कोणाचे?
वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिर आणि मंदिराची सर्व्हे क्रमांक २९९ मधील १३ एकर २ गुंठे जमीनीच्या हक्कावरून हा वाद सुरू झाला आहे.
केंद्र सरकारने २७ सप्टेंबर १९६० रोजी मंदिर आणि शेतीच्या संवर्धन-संरक्षणाची जबाबदारी ही पुरातत्व सर्व्हेक्षण विभागास दिली होती. तेव्हापासून पुरातत्व विभाग मंदिर वास्तुची देखभाल, सुरक्षा करीत आहे. मंदिराच्या देखभालीसाठी सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी तैनात केले. त्यांना पुरातत्व विभागाकडून वेतन दिले जाते.
मात्र, २०१० मध्ये खुलताबादचे तहसीलदार यांनी पुरातत्व विभागाचे सातबाऱ्यावर नाव घेतले. सोबतच पुजारी रविंद्र प्रल्हादराव पुजारी यांचे इतर हक्कात नाव घेतले.
ही जमीन इनामी असून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुजारी कुटुंबियांनी दान केली असल्याचा पुजारी पुराणिक यांचा दावा आहे. त्यामुळे पुजारी पुराणिक यांनी मालकी हक्कात आपले नाव घेण्यात यावे यासाठी त्याने न्यायालयात दावा दाखल केला.
त्यावेळी ज्याला जमीन दान केली होती, त्यास पुत्र नसल्याने त्याने दत्तक पुत्र घेतला. पुढे त्यालाही पुत्र झाला नसल्याने त्यांनी दत्तक पुत्र घेतला. त्यानंतरच्या पिढीतही दत्तक पुत्रच घेण्यात आला. सध्याचे पुजारी पुराणिक हे देखील दत्तकपुत्र असल्याचे पुरातत्व विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पुजारी रवींद्र पुराणिक यांनी औरंगाबाद जिल्हा न्यायालयात मंदिर आणि शेतजमिनीवर मालकी हक्कासाठी दावा दाखल केला. त्यावरून त्यांचा दावा मंजूर करण्यात आला. यास जिल्हा न्यायालयानेही आपिलात मंजुरी प्रदान केली. खालच्या दोन्ही न्यायालयांनी पुराणिक यांचा मंदिर आणि त्याच्या जागेवर ताबा असल्याचे मान्य केले.
औरंगाबाद जिल्हा न्यायालयाने निकाल दिल्यानंतर भारतीय पुरातत्त्व खाते औरंगाबाद जिल्हा न्यायालयाच्या निकालाविरोधात औरंगाबाद खंडपीठात आपिल दाखल केले. त्यांनीही २७ सप्टेंबर १९६० पासून पुरातत्व विभागाकडून स्वरक्षण आणि देखभालीची देखभाल केले जात असल्याचं नमूद करण्यात आलंय. त्यामुळे घृष्णेश्वर मंदिर आणि जमिनीवर पुरातत्व विभागाचा दावा त्यांनी केला आहे.
औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात प्रतिवादी पुजारी रवींद्र पुराणिक यांना नोटीस बजावली आहे. आता पुढची सुनावणी तीन आठवड्यानंतर होणार आहे. मात्र, कोट्यावधी भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेले घृष्णेश्वर कोणाच्या मालकीचे हे पुढील काळात कळेल.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.