पुणे : लाॅकडाऊन असतानाही डीएचएफएलच्या वाधवा कुटुंबाला लोणावळा ते महाबळेश्वर या प्रवासासाठी दिलेली परवानगी गृहखात्याचे प्रधान सचीव (विशेष) अमिताभ गुप्ता यांना चांगलीच नडली आहे. हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
वाधवा कुटुंबासह २३ जणांना या प्रवासाची परवानगी गुप्ता यांनी आपल्या अधिकृत लेटरहेडवर दिल्याचे उघडकीला आल्यानंतर खळबळ उडाली होती. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. वाधवा कुटुंबियांवर येस बँक व अन्य एका घोटाळ्यात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे.
दरम्यान या प्रकरणाची चौकशी होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसारअमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे ट्वीट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पहाटे दोनच्या सुमारास केले. त्यांच्या विरुद्धची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
वाधवा कुटुंबिय हे माझे परिचित असून ते आमचे कौटुंबिक मित्रही आहेत. त्यांना व त्यांच्याबरोबरील लोकांना 'कौटुंबिक आणिबाणी'च्या कारणासाठी खंडाळा ते पाचगणी असा प्रवास करु द्यावा, असे पत्र गुप्ता यांनी दिले होते. त्यात वाधवा यांच्यासह त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांच्या एकूण पाच गाड्यांचे क्रमांक व त्यात असलेले लोक याचाही तपशील देण्यात आला होता.
जिल्हाबंदीचा आदेश धाब्यावर बसवून हे उद्योजक २३ जणांसह खंडाळ्याहून महाबळेश्वरला पोहोचले होते. ५ गाड्यांमधून हे वाधवा कुटुंब महाबळेश्वरला पोहोचले होते. पण स्थानिकांनी विरोध केल्याने त्यांना पाचगणीतच थांबवण्यात आले. काल मध्यरात्री या सर्वांना ताब्यात घेऊन विलिनीकरण कक्षात ठेवण्यात आले. या सर्वांवर कलम १८८ नुसार वाई पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.