मुंबई: भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 450 अंशांची घसरण झाली होती. आता शेअर बाजार सावरला असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 217.82 अंशांच्या घसरणीसह 35 हजार 995 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 56.50 अंशांनी घसरून 10 हजार 823 पातळीवर आहे.
सेन्सेक्सने इंट्राडे व्यवहारात आज 35 हजार 714.16 अंशांची तर निफ्टीने 10 हजार 729 अंशांची नीचांकी पातळी गाठली आहे. आज सकाळी भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानमधील बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकून जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा कंट्रोल रुम उद्ध्वस्त केले आहे. पाकिस्तान हद्दीत मोठी कारवाई केल्याची माहिती पाकिस्तानच्या लष्कराच्या प्रवक्त्याने दिल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईची माहिती सर्वांसमोर आली. त्यानंतर याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात देखील दिसून आले. गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याने शेअर बाजारात सकाळच्या सत्रात घसरण झाली.
सध्या मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस, आयओसी आणि झी या कंपन्यांचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत. तर एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आणि एसबीआयच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.