'ग्रीन,ऑरेंज झोनमधील उद्योग अंशत: सुरू होणार' पण...

'ग्रीन,ऑरेंज झोनमधील उद्योग अंशत: सुरू होणार' पण...

कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय.  ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये येणाऱ्या काही जिल्ह्यातल्या उद्योगांना माफक स्वरुपात परवानगी देण्यात येणारय. कोरोनाच्या संकटात रुतलेलं अर्थचक्र फिरलंच पाहिजे. त्यासाठी आजपासून काही ठिकाणी आपल्याला सुरूवात करावीच लागेल असं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, अर्थव्यवस्थेचा गाडा सुरळीत चालवायचा असेल तर काही अंशी का होईना उद्योग सुरू ठेवा अशी भूमिका सातत्यानं साम आणि सकाळनं मांडलीये.

मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांद्वारे आज राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सामाजिक दायित्व निधीची रक्कम देण्यासाठी स्वतंत्र सीएसआर खाते उघडले असल्याचीही माहिती दिली.

बऱ्याचवेळा  रुग्ण  शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात येत आहेत. त्यांचे चाचणी अहवाल येण्याआधी दुर्दैवाने काही जणांचे मृत्यू झाले आहेत. अशांसाठी  इच्छा असूनही आपण काही करू शकत नाही,   अशी खंत व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्दी, ताप आणि खोकला यासारखी लक्षणे दिसताच घरी उपचार   करू नका, रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्या. वेळेत योग्य उपचार करुन घेतले  तर, रुग्ण  बरे होऊन घरी जात असल्याचेही स्पष्ट केले.

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये माफक मुभा
कोरोनाचे रुग्ण आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने उद्यापासून काही अटींवर ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांत उद्योग सुरू करण्यास मान्यता दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ‘‘आतापर्यंत शेतीविषयक कामे, शेतमालाची वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरूच होती. परंतु, अर्थचक्र सुरु करतांना  ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जे उद्योजक-कारखानदार त्यांच्या कामगारांची काळजी घेतील, त्यांची तिथेच राहण्याची व्यवस्था करतील, त्यांना उद्यापासून काम सुरू करण्यासाठी मुभा देण्यात येईल.  त्यासाठी त्यांना आवश्यक असलेला कच्चामाल आणि अन्नधान्य पुरवण्यात येईल. आपल्याला मालवाहतूक सुरू करायची आहे, विषाणूची नाही. कोणताही धोका स्वीकारायचा नाही. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने जे आदेश दिले आहेत, त्यांचे तंतोतंत पालन केले जाईल,’’ असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यांच्या सीमा बंदच
जिल्ह्यांच्या सीमा आपण उघडलेल्या नाहीत हे अधोरेखित करून मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘एका जिल्ह्यातील माणसे  दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास परवानगी नाही. राज्यातील नागरिकांसाठी हा लॉकडाउन संपलेला नाही. ३ मे पर्यंत त्यांनी आहे तसेच घरी राहायचे आणि सामाजिक अंतराची शिस्त पाळायची आहे.’’ राज्यात अँटी कोरोना पोलिसही उत्तम सेवा देतांना दिसत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

वृत्तपत्र वाटपाचा निर्णय नंतर
वृत्तपत्रांबाबतची आपली भूमिका स्पष्ट करतांना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘वृत्तपत्रे स्टॉलवर उपलब्ध करून देता येतील. परंतु, घरोघरी जाऊन वितरित करण्यास परवानगी देता येणार नाही. मुंबई-पुणे वगळून राज्यात याबाबत इतरत्र काय करता येईल यासंदर्भातील निर्णय नंतर घेतला जाईल.’’

अत्याचाराबद्दल पोलिसांना कळवा
राज्यातील जनतेने आतापर्यंत अतिशय संयम, जिद्द आणि धैर्य दाखवून या संकटाचा सामना केला आहे, त्यांचे मी आभार मानतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘खूप काळ घरी राहिल्याने मानसिकस्थिती थोडीफार इकडे तिकडे होते. परंतु याचा अर्थ असा नाही की लॉकडाउन आहे म्हणून पुरुषांनी घरातील महिलांना त्रास द्यावा. महिलांवर घरात अत्याचार होता कामा नयेत. दुर्दैवाने असा अत्याचार होत असल्यास महिलांनी १०० नंबरवर फोन करून पोलिसांना कळवावे, पोलिसरुपातील भाऊ नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील.’’

समुपदेशन सेवा
मानसिक अस्वस्थता वाढली असेल, समुपदेशनाची गरज असेल त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई महानगरपालिका आणि बिर्ला या संस्थेच्या विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनचा नंबरही सांगितला. १८००१२०८२००५० असा तो नंबर आहे. याशिवाय आदिवासी विभागाने प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुल्लता यांच्या संयुक्त विद्यमाने एक सेवा सुरू केली असल्याचे व त्याचा नंबर १८००१०२४०४० असा असल्याचेही ते म्हणाले.

‘नॉन कोविड’ रुग्णांसाठीच
राज्यातील खासगी डॉक्टरांशी मी तसेच टास्कफोर्सचे डॉक्टरही बोलले असून, त्यांची कोरोनाविरुद्ध लढायची तसेच दवाखाने उघडण्याची तयारी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘ ही रुग्णालये फक्त ‘नॉन कोविड’ रुग्णांसाठी, ज्यांना हृदयरोग, मूत्रपिंडाचे आजार किंवा मधूमेहासारखे गंभीर आजार आहेत त्यांच्या उपचारासाठी आहेत.  सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांनी या दवाखान्यात जाऊ नये, सरकारी दवाखान्यात येऊन तपासणी करावी.’’

काळजी घेण्याची गरज
राज्यात जवळपास ६७ हजार चाचण्या करण्यात आल्या असून यातील ९५ टक्के केसेस निगेटिव्ह आल्या आहेत. साधारणत: ३६०० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, ही आकडेवारी काल रात्रीची आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘राज्यात ३०० ते ३५० रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी सुखरूप गेले आहेत, ही समाधानाची बाब आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७० ते ७५ टक्के जणांमध्ये कोरोनाची अतिसौम्य लक्षणे आहेत किंवा लक्षणेच दिसत नाहीत अशी स्थिती आहे. ५२ रुग्ण मध्यम ते अतिगंभीर आहेत. त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सहा महिन्यांच्या बाळापासून ते ८४ वर्षांच्या आजीपर्यंत रुग्ण बरे होतांना दिसत आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही तर, काळजी घेण्याची गरज आहे.  राज्यात रुग्णांच्या संख्येत घट होतांना दिसत असले तरी, कुठल्याही भ्रमात राहण्याची इच्छा नसल्याने याची पुन्हा तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.’’

अडकलेल्यांना दिलासा
लॉकडाउनमुळे अडकलेल्या इतर राज्यातील तसेच राज्यातील कामगारांनी, मजुरांनी आहे तिथेच राहावे, राज्य सरकार त्यांची पूर्ण काळजी घेईल, असा विश्वास देतांना मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचे सांगितले. यातून लवकरच मार्ग निघेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी सुखरुप पाठवू, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

सवलतीच्या दराने धान्य
केशरी रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दराने राज्य सरकार अन्नधान्य वितरित करत आहे. केंद्रही आधारभूत किंमतीने धान्य देण्यास तयार आहे, असे सांगतांना केंद्र सरकार मोफत धान्य देते परंत, ते केवळ तांदुळ आहेत आणि त्याचा लाभ फक्त अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मिळत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तांदुळासोबत गहू आणि डाळीची केंद्रसरकारकडे मागणी केली असल्याचे व ते मिळताच त्याचेही वाटप सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हे होणार सुरू

• नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेरील भागातील ग्रामीण भागातील उद्योग.
• ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी उद्योगांना चालना देता येईल. यात उद्योगांना आपल्या कामागारांना कारखान्याच्या किंवा कंपनीच्या आवारातच राहण्याची व्यवस्था करावी लागेल. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातून कामगारांची ने आण करण्यास मनाई असेल.
• कोळसा उद्योग, खाण आणि खनिज उद्योग
• कृषी व बागायती कामांसाठी लागणारी साहित्य विक्री
- कृषी माल खरेदी-विक्री केंद्रे, मार्केट यार्ड.
• सागरी व स्थानिक मासेमारी, मत्स्य उत्पादनाशी संबंधित व्यवसाय.
• चहा, कॉफी, रबर, बांबू, नारळ, सुपारी, काजू आणि मसाले यांच्या वृक्षारोपणाची कामे. तसेच यांच्यावरील प्रक्रिया, पॅकेजिंग, विक्री आणि मार्केटिंगची कामे जास्तीत जास्त ५० टक्के मजुरांसह करता येतील.
• पोल्ट्री फार्म, हॅचरीज
- ट्रक तसेच इतर वाहने यांना दोन चालक, एक मदतनीस यांच्यासह प्रवास करण्यास परवानगी.
- जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठासाखळीतील सर्व सेवा (वेळेचे बंधन नाही)
- किराणा माल, रेशन, फळे व भाज्याविक्री दुकाने (वेळेचे बंधन नाही)
• फरसाण किंवा तत्सम पदार्थांची आणि मिठाईची दुकाने (जिथे आत बसून खाण्यास परवानगी नाही.)
• ई-कॉमर्स कंपन्या. यांना फळे वैद्यकीय साहित्य इत्यादींची डिलीव्हरी देता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com