मुंबई : कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 'एअर इंडिया'च्या अनेक उड्डाणांना आज (गुरुवार) विलंब झाला. यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचा खोळंबा झाला. यामुळे ऐनवेळी 'एअर इंडिया'ने इतर कर्मचाऱ्यांना पाचारण करत परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला.
दिवाळीचा बोनस न मिळाल्याने 'एअर इंडिया'च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कालपासून (बुधवार) अचानक काम बंद आंदोलन केले. हे सर्व जण 'एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड' या उपकंपनीचे कंत्राटी कर्मचारी आहेत. या उपकंपनीद्वारे देशातील सर्व विमानतळांवरील 'एअर इंडिया'च्या विविध सेवा हाताळल्या जातात.
जवळपास पाच हजार कर्मचारी या सेवेत आहेत. यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने मुंबई विमानतळावरून आज सकाळपासून नियोजित असलेली उड्डाणे पुढे ढकलावी लागली. कायमस्वरूपी सेवेत असलेल्या आणि सध्या रजेवर किंवा सुटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून घेण्यात आले.
'आज सकाळी दहा देशांतर्गत उड्डाणे आणि तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांना विलंब झाला. काही उड्डाणे जवळपास तीन तास पुढे ढकलावी लागली', असे 'एअर इंडिया'च्या प्रवक्त्याने 'पीटीआय'ला सांगितले.
WebTitle : marathi news employees of air India goes on strike for not getting bonus
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.