नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईमध्ये येत्या काही महिन्यांत वाढ करण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले आहे. विशेषतः दक्षिणेकडील राज्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्या असल्यामुळे त्या ठिकाणी नक्षलीविरोधी कारवाई अधिक आक्रमक असेल. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
नक्षलवाद्यांविरोधात निर्णायक लढाई सुरू करण्यात येणार आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. विविध राज्यांमधील नक्षलवादविरोधी कारवायांमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल महत्त्वाची भूमिका निभावत असते. संबंधित राज्यातील पोलिसांच्या सहकार्याने त्या त्या ठिकाणी उग्र नक्षलवाद्यांविरोधात कारवाई केली जाते. त्यामुळे आता या निर्णायक लढाईत केंद्रीय राखीव पोलिस दल महत्त्वाची भूमिका निभावणार आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
मंगळवारी केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा यांच्या नेतृत्त्वाखाली एक उच्चस्तरिय बैठक झाली. या बैठकीत देशातील नक्षलवादी कारवायांचा आढावा घेण्यात आला आणि पुढील रणनिती निश्चित करण्यात आली.
गृह मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात नक्षलवादी चळवळीला ओहोटी लागल्याचे चित्र आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कट्टर डाव्या विचारांच्या नक्षलवाद्यांकडून केल्या जाणाऱ्या कारवाया मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. विविध जिल्ह्यांमधील नक्षलवादी हिंसक कारवायांचे प्रमाण ९१ वरून ५८ पर्यंत खाली आले आहे, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
नक्षलवाद्यांकडून केल्या जाणाऱ्या दोन तृतीयांश हिंसक कारवाया या देशातील केवळ १० जिल्ह्यांमध्येच होत आहेत, याकडेही गृह मंत्रालयाने लक्ष वेधले. छत्तीसगढ, मध्य प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्र या ठिकाणी नक्षलवादी हिंसक कारवाया सुरू आहेत.
Web Title: Govt plans decisive push against Maoists
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.