भारत पोकळ धमक्यांनी घाबरणार नाही: एम.एम. नरवाणे

भारत पोकळ धमक्यांनी घाबरणार नाही: एम.एम. नरवाणे


लष्कराच्या पूर्वोत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एमएम नरवाणे यांनी मंगळवारी पाकिस्तान आणि चीन या दोन्ही शेजारी देशांना कठोर शब्दात संदेश दिला. आतापर्यंत चीनने नियंत्रण रेषेवर वादग्रस्त क्षेत्रात 100 वेळा प्रवेश केला आहे. परंतु आताचे भारतीय लष्कर हे 1962 च्या भारत चीन युद्धासारखे राहिलेले नाही, असे ते यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी पाकिस्तानलाही स्पष्ट शब्दात इशारा दिला. पाकिस्तानने कितीनी अण्विक हल्ल्याच्या धमक्या दिल्या तरी भारत आता त्याला घाबरणार नसल्याचे नरवाणे यांनी सांगितले.


कोलकात्यामध्ये भारत चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘आपल्या सीमांची सुरक्षा’ या परिसंवादात ते बोलत होते. डोकलाममध्ये भारतीय लष्कर चीनच्या लष्करासमोर उभे ठाकले होते. त्यावरून भारतीय लष्कर हे दुबळे नाही असा संदेश चीनला मिळाला होता, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमादरम्यान माजी हवाईदल प्रमुख अरूप राहा हेदेखील उपस्थित होते. 1962 नंतर उचलण्यात आलेल्या पावलांबद्दल त्यांनी सवाल त्यांनी केला. आता हे 1962 मधील लष्कर नाही. जर चीन आपल्याला सांगतो इतिहास विसरू नका, तर आपणही त्यांना असंच सांगितलं पाहिजे. भारत आता 1962 पासून फार पुढे आला आहे. 2017 मध्ये चीनने डोकलाममध्ये केलेल्या घुसखोरीदरम्यान, त्यांची कोणतीही तयारी दिसून आली नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. तसेच डोकलामनंतर चीनकडून डोकलामनंतरही घुसखोरीचे प्रयत्न झाले. परंतु भारतानेही त्यांना योग्यप्रकारे उत्तर दिलं. दोन्ही बाजूंनी हे प्रकार अनेकदा सुरू होते. त्यांनी दोन नव्या चौक्या तयार केल्या आम्हीही त्या ठिकाणी दोन नव्या चौक्या उभारल्या, असेही नरवाणे यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना नरवाणे म्हणाले की, “वादग्रस्त क्षेत्रात चीनने शंभरवेळा प्रवेश केला असेल तर आम्हीही दोनशे वेळा प्रवेश केला. हे केवळ एकीकडूनच होतं असं नाही. आपल्याबद्दलही त्यांनी त्यांच्या वॉररूमशी तक्रार केली असेल,” असेही ते यावेळी म्हणाले. 1962 मधील युद्ध हे भारतीय सैन्याचा नाही तर राजकीय पराभव होता. आपलं सैन्याला लढण्याचे आदेश दिले तेव्हा आपलं सैन्य संपूर्ण ताकदीनीशी लढलं, असंही ते म्हणाले.

पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरणार नाही

पाकिस्तानने अण्विक हल्ल्याच्या कितीही धमक्या दिल्या तरी भारत त्याला घाबरणार नाही. त्यांनी अशा धमक्या देणं सुरू ठेवावं. कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये झालेल्या परिवर्तनाचे तिकडची जनताही स्वागत करत आहे. काश्मीरला दोन विभागांमध्ये विभागल्यानंतर आता राज्यातील 55 टक्के जनता ही लडाखमध्ये आहे. काश्मीरमध्ये केवळ पाच जिल्हे आहेत जे संपूर्ण राज्यात अशांती परसवत आहेत आणि ज्या ठिकाणाहून दहशतवादी कारवाया होत आहेत. पाच जिल्ह्यांसाठी संपूर्ण देशाला बंधक बनवून ठेवायचे का?  असा सवालही नरवाणे यांनी यावेळी केला.


Web Title: The Indian Army Is Capable Of Dealing With Any Situation Says M M Naravane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com