पहिला निकाल गडचिरोलीचा; सर्वांत उशीरा बीडचा येण्याची शक्यता
मुंबई - विधानसभा मतदारसंघनिहाय कोणत्याही पाच मतदान केंद्रांवरील "ईव्हीएम' आणि "व्हीव्हीपॅट'ची मोजणी झाल्यानंतरच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकृत आणि अंतिम निकालासाठी सर्वांना प्रतीक्षा करावी लागेल. राज्यात लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल गडचिरोली-चिमूरमधून येण्याची दाट शक्यता आहे, तर सर्वाधिक उमेदवार संख्येमुळे बीडचा निकाल सर्वांत उशिरा लागण्याची चिन्हे आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात कॉंग्रेसप्रणीत महाआघाडी, भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जोरदार राजकीय चुरस रंगली होती. राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी पार पडल्यापासून निवडणूक निकालाची प्रतीक्षा उद्या (ता. 23) संपुष्टात येत आहे. राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बारामती, सोलापूर, माढा, कोल्हापूर, नगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नांदेड, दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबई या मतदारसंघांत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे.
राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक मतमोजणीला उद्या सकाळी आठ वाजल्यापासून सुरवात होईल. त्यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. सुरवातीला पोस्टल बॅलेटची मोजणी होईल. ती संपल्यानंतर "ईव्हीएम'ची मोजणी हाती घेण्यात येईल. "ईव्हीएम'नंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही पाच मतदान केंद्रांवरील "ईव्हीएम' आणि "व्हीव्हीपॅट'ची पडताळणी केली जाईल. चिठ्ठ्या टाकून ही केंद्रे निवडण्यात येतील. एखाद्या उमेदवाराने विशिष्ट "ईव्हीएम'चा आग्रह धरला, तर निवडणूक निर्णय अधिकारी त्याबाबत निर्णय घेऊ शकतात. पाच मतदान केंद्रांवरील "ईव्हीएम' आणि "व्हीव्हीपॅट' मोजणीसाठी चार ते पाच तास लागणार आहेत. ही मोजणी झाल्यानंतरच अधिकृत निकाल जाहीर होईल. त्यामुळे यंदा निकाल घोषित होण्यास विलंब लागेल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.
Web Title: marathi news mahamaharashtra news loksabha election results
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.