भाजपला पाठिंब्यासाठी शरद पवारांनी मोदींपुढे ठेवल्या होत्या दोन अटी!

Sharad Pawar, Narendra Modi
Sharad Pawar, Narendra Modi

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या समीकरणाचं सरकार सत्तेवर आलं असलं तरी, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीची चर्चा झाली होती, असं आता स्पष्ट होऊ लागलंय. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातच या विषयी चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. या चर्चेत शरद पवार यांनी अशा दोन अटी ठेवल्या की, ज्या भाजप पूर्ण करणं शक्य नव्हतं. या दोन अटींमुळंच भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस ही आघाडी होऊ शकली नाही.

काय होत्या दोन अटी?
पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यात महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या दृष्टीने चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. एनडीटीव्ही या वृत्तसमूहाने भाजपमधील सूत्रांच्या हवाल्याने या संदर्भात बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्या संदर्भात चर्चा झाली. पण, त्यात शरद पवार यांनी दोन अटी ठेवल्या होत्या. त्यात पहिली अट, मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी दुसऱ्या नेत्याचे नाव द्यावे तर दुसरी अट सुप्रिया सुळे यांना केंद्रात कृषी किंवा इतर बड्या खात्याचे मंत्रिपद द्यावे. या दोन अटी भाजप कधी मान्य करून शकत नाही, हे पवार यांना माहिती होते. घडलेही तसेच, पंतप्रधान मोदींनी पहिल्या अटीलाच नकार दिल्यामुळं भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी होऊ शकली नाही.

कृषी खाते का दिले नाही?
शरद पवार यांनी ठेवलेली दुसरी अटही  पंतप्रधान मोदी यांना मान्य नव्हती. जर, राष्ट्रवादी काँग्रेसला कृषी मंत्रालयासारखे मोठे खाते दिले तर, सुरुवातीपासून रेल्वे मंत्रालयासाठी आग्रही असलेला बिहारमधील संयुक्त जनता दल पुन्हा रेल्वे खात्याची मागणी करू शकतो, अशी भीती भाजपला होती. यामुळे भाजप धर्म संकटात पडू शकते. या विचारानेच पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांची दुसरी अट मान्य केली नाही, असे एनडीटीव्हीने म्हटले आहे.  


फडणवीस यांच्यावरच विश्वास 
भाजप नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास टाकला होता. मुख्यमंत्रिपदाचे उमदेवार फडणवीस यांनाच करून भाजपने निवडणूक लढवली होती. त्यांच्या नेतृत्वाखालीच भाजपने सर्वाधिक 105 जागा जिंकल्या. त्यामुळं राष्ट्रवादीची अट म्हणून, फडणवीस यांच्या जागी दुसऱ्या कोणाचं नाव पुढं करणं भाजपला शक्य नव्हतं.  


आरोप-प्रत्यारोप फक्त भाजप-शिवसेनेत
निवडणूक निकालानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यात त्यांनी कोठेही भाजपवर कठोर शब्दांत प्रहार केले नाहीत. निवडणूक प्रचारात त्यांनी केवळ भाजप आणि भाजपला लक्ष्य केले होते. पण, निकालानंतर आरोप-प्रत्यारोप भाजप आणि शिवसेना यांच्यातच सुरू झाले. पवार यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान मोदींपुढे प्रस्ताव देऊन त्यांना विचार करण्यासाठी वेळ दिला होता. त्यानंतर संसद भवनात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची त्यांच्या दालनात भेट घेतली होती. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये 40-45 मिनिटे चर्चा झाली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही अटी मान्य करायला तयार झाले नाही. त्यामुळं पुढे बोलणी फिस्कटल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितल्याचे बातमीत म्हटले आहे.

Web Title: sharad pawar was agreed to support bjp in maharashtra with two conditions
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com