मुंबई - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात नव्याने दोन हजारांहून अधिक मतदान केंद्रे वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात एकूण ९७ हजार ६४० मतदान केंद्रे असणार आहेत.
नाशिकमध्ये २७४ वाढीव मतदान केंद्रे, पुण्यामध्ये २३७ आणि ठाण्यामध्ये २२७ वाढीव मतदान केंद्रे असणार आहेत. मात्र, सिंधुदुर्गमध्ये एकही वाढीव मतदान केंद्र नसेल. साधारणपणे १ हजार ४०० मतदारांमागे एक मतदान केंद्र असण्याचे प्रमाण आहे. गेल्या काही दिवसांत मतदारांना नाव नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. यामध्ये मतदारांची वाढ झाल्याचे दिसून आल्याने मतदान केंद्रांतही वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी यापूर्वी ९५ हजार ४७३ मतदान केंद्रे स्थापन करण्याचे नियोजन होते. आता मात्र मतदारांची संख्या वाढली असल्याने नव्याने २ हजार १६७ मतदान केंद्रे राज्यभरात वाढविण्यात आली आहेत. याचाच अर्थ आता एकूण ९७ हजार ६४० मतदान केंद्रे असणार आहेत. २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण ६४ हजार ५०८ मतदान केंद्रे होती. तर, २००९ मध्ये एकूण ८३ हजार ९८६ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली. २०१४ मध्ये एकूण ९१ हजार ३२९ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली.
यंदाच्या निवडणुकीमध्ये ९७ हजार ६४० मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान १५ प्रकारच्या मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे.
Web Title: Two thousand increase in voting centers
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.