Loksabha 2019 : 'न्याय'मुळे भाजपला घाटा

Loksabha 2019 : 'न्याय'मुळे भाजपला घाटा

नवी दिल्ली - गरिबांना दरमहा सहा हजार रुपये देण्याचे आश्‍वासन देणाऱ्या काँग्रेसच्या "न्यूनतम आय योजना' अर्थात "न्याय' या प्रस्तावित योजनेमुळे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांतच भाजपला विदर्भासह किमान पाच राज्यांत किमान 30 ते 35 जागांचा घाटा होण्याची भीती पक्षाच्याच एका अंतर्गत अहवालातून समोर आल्याचे समजते. या योजनेचा प्रभाव वाढत चालल्याचे फीडबॅक आल्याने भाजप यापुढे हवाई हल्ले, राष्ट्रवाद, भारत-पाकिस्तान वगैरे मुद्द्यांचा गजर करणे अपरिहार्य ठरले आहे. एका भाजप नेत्याने याला दुजोरा दिला. 

काँग्रेसची नवी योजना भाजपच्या दृष्टीने गंभीर असल्याचे सत्तारूढ पक्षाच्या चाणक्‍यांनी तत्काळ ओळखले होते. त्यामुळे अर्थमंत्री अरुण जेटली त्याच दिवशी सायंकाळी उशिरा पत्रकारांसमोर आले व त्यांनी या योजनेबाबतचा "तुच्छतावादी' युक्तिवाद केला. देशातील घटलेले रोजगार, कंबरडे मोडलेली अर्थव्यवस्था, जीएसटीमुळे संत्रस्त व्यापाऱ्यांचे हाल, शेतकऱ्यांचे हाल, नोटाबंदीमुळे भरडलेला सामान्य नागरिक अशी मोदी सरकारची पंचवार्षिक "कामगिरी' एकीकडे व दुसरीकडे कॉंग्रेसची "न्याय' योजना यामुळे पहिल्या दोन टप्प्यांतच भाजपला जबर घाटा होण्याची शक्‍यता व्यक्त होते. देशाच्या ग्रामीण भागांत "न्याय' योजनेद्वारे प्रस्तावित केलेल्या सहा हजार रुपयांचा छनछनाट वाढत्या क्रमाने प्रभावी ठरत असल्याचे फीडबॅंक आल्याने भाजप वर्तुळात चिंता पसरली आहे. 

बालाकोटनंतर भाजपच्या गोटात विश्‍वास निर्माण झाला होता व भाजप आघाडी नव्हे तर फक्त पक्षाला किमान 300 जागा मिळतील असा विश्‍वास नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला होता. भाजपला "न्याय'चा फटका छत्तीसगड, विदर्भ, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, तेलंगण व आंध्र प्रदेशात बसू शकतो असे हा अहवाल स्पष्टपणे म्हणतो. अर्थात, उत्तर प्रदेशात याचा फारसा प्रभाव जाणवत नसल्याचेही हा अहवाल सांगतो व तोच भाजपसाठी किंचित दिलासा ठरला आहे. 

पाडव्याला जाहीरनामा शक्‍य 
काँग्रेसने जाहीरनामा प्रकाशनात आघाडी घेतली तरी भाजपचे संकल्पपत्र कधी जाहीर होणार याबाबत वरिष्ठ नेतेही बोलण्यास धजावत नाहीत. पक्षाच्या मुख्यालयात सध्या जाहीरनामा प्रकाशनाची पूर्वतयारी वेगाने सुरू आहे. हिंदू नववर्षदिनाच्या (शनिवार) आसपास म्हणजे चार ते सहा एप्रिलदरम्यान जाहीरनामा प्रसिद्ध होईल असे भाजपमधून समजते. तथापि, यात पाच तारखेला अमावस्या असल्याने तो दिवस बाद ठरला, तर संभवतः चार तारखेला (गुरुवार) भाजपचे संकल्पपत्र समोर येण्याची चिन्हे आहेत. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा तो अखेरचा दिवस आहे.

Web Title: BJP face a big loss because of congress nyay scheme

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com