इस्लामाबाद ः जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे "कलम 370' रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानच्या जिव्हारी लागला. त्यामुळे भारताबरोबरील सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय पाकिस्तानने आज घेतला. त्याचबरोबर भारतीय उच्चायुक्त अजय बिसरिया यांनाही मायदेशी पाठविण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक आज झाली. बैठकीला पाकिस्तानचे लष्करी अधिकारीही उपस्थित होते. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीच याबाबतची घोषणा केली.
"आमचे उच्चायुक्त आता भारतात काम करणार नाहीत; तसेच भारताच्या उच्चायुक्तांनाही परत पाठविले जाईल,'' असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी बैठकीनंतर सांगितले.
मोईन उल हक यांची पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र त्यांनी अद्याप भारतात येऊन सूत्रे स्वीकारलेली नाहीत. ते आता भारतात येणार नाहीत.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताने "कलम 370' हटवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाकिस्तानी लष्कराला नियंत्रण रेषेवर दक्ष राहण्याचेही आदेश दिले आहेत.
Web Title: Pakistan calls back high commissioner expels Indian envoy suspends bilateral trade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.