राळेगणसिद्धी - ‘‘सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करून जनहिताची कामे केल्याबद्दल सरकारने मला ‘पद्मभूषण’ सन्मान दिला आहे. कायदा करूनही सरकार लोकपाल व लोकायुक्तांची नियुक्ती करत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही. सरकारला जनतेच्या प्रश्नांबाबत काहीच देणे-घेणे नसेल, तर मलाही ‘पद्मभूषण’ नको. सरकारने पावले न उचलल्यास आठ किंवा नऊ तारखेला तो परत करणार,’’ असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला.
हजारे म्हणाले, ‘‘मला इतक्यात काही होणार नाही. उपोषणाला फक्त पाचच दिवस झाले आहेत. अजून पाच दिवस मी तंदुरुस्त राहीन. थोडे वजन कमी झाले व थकवाही जाणवत आहे. त्याने मला काही होणार नाही.’’
महाजनांच्या भेटीबाबत विचारले असता, ते म्हणाले, ‘‘केंद्राने लोकपाल कायदा केला; परंतु चार वर्षे झाली, तरी लोकपालची नेमणूक केली नाही. तसेच स्वामिनाथन आयोगाचा उल्लेखही अर्थसंकल्पात आला नाही. शेतकऱ्यांच्या मालाला दीड पट भाव दिल्याचे सरकार सांगत असले, तरी प्रत्यक्षात दिला असता, तर शेतकऱ्यांनी कांदा, टोमॅटो रस्त्यावर फेकले नसते. आम्ही शेतकरी आणि शेतमजुरांना मासिक पाच हजार रुपये निवृत्ती वेतनाची मागणी केली होती; सरकारने मात्र वार्षिक सहा हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.’’
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या पत्राबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ‘‘त्यात चूक काय आहे? मी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करीत आहे. केंद्राने आंदोलनाची चौकशी केली नाही.
अण्णांच्या जिवाशी खेळू नका..!
मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जिवाशी खेळू नका, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला केले आहे. अण्णांच्या उपोषणाला शुभेच्छा देणारे पत्र पंतप्रधान मोदी यांनी पाठविल्याने ठाकरे यांनी संतापही व्यक्त केला आहे. ‘अण्णांचा लढा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, त्यामुळे अण्णांनी नव्या क्रांतीसाठी जयप्रकाश नारायण यांची भूमिका स्वीकारावी,’ असे आवाहनही उद्धव यांनी केले आहे.
Web Title: anna hazare says Padmabhushan will be returned
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.