
मुंबई: मागील काही महिन्यांपासून राज्यात सुरु असलेलं राजकीय घमासान, त्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेली बंडाळी. भाजपने शिंदेना दिलेली साथ आणि या सर्व रहस्यमयी घडामोडीनंतर राज्यात सत्तेवरती आलेलं शिंदे-फडणवीस सरकार. मात्र, या शिंदे-फडणवीस सरकार येण्यामुळे आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रापदीवरुन पायउतार होण्यामुळे राज्यभरात शिवसेनेमध्ये उभी फूट पडली.
या फुटीमुळे राज्यात शिंदे आणि ठाकरे असे दोन गट शिवसेनेमध्ये निर्माण झाले. एकमेकांच्या गटाने विरोधी गटांविरोधात आंदोलन निर्दशनं केली. शिंदे गटाकडून अनेक आरोप ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर करण्यात आले. याच सर्व पार्श्वभूमिवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रासाठी एक मुलाखत दिली असून या मुलाखतीत त्यांनी अनेक गंभीर खुलासे केले आहेत.
पाहा व्हिडीओ -
बाळासाहेब ठाकरेंनंतर (Balasaheb Thackeray) शिवसेना खतम करायची त्यांची योजना होती का? 'बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेना खतम करायची अशी त्यांची योजना होती. त्यांचं तेच स्वप्न होतं. पण बाळासाहेबांनंतर तुम्ही शिवसेना उभी केलीत, असा प्रश्न त्यांना संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्यांच्या पोटात तेच दुखतंय. त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे आहेत. जसं गांधी आणि काँग्रेस वेगळी करायची होती, होय खरंच आहे. मला केवळ टीकात्मक बोलायचं म्हणून मी बोलत नाही.
मात्र, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषबाबू तसं बाळासाहेब. हे स्वतःचेच म्हणून आता लोकांसमोर आणायचा प्रयत्न करताहेत. आपल्याकडून काही आदर्श निर्माण झाला नाही त्यामुळे जसा पक्ष फोडत आहेत तसेच दुसऱ्यांचे आदर्श देखील फोडायचे असा त्यांचा डाव असल्याची टीका ठाकरे यांनी शिंदे आणि भाजप यांच्यावर केली.
ते पुढे म्हणाले, 'फोडायचे म्हणा किंवा पळवायचे म्हणा, आणि ते आपलेच म्हणून लोकांसमोर जायचं. तसं त्यांचं चाललंय की बाळासाहेबांना त्यांनी मानसन्मान तर दिलाच पाहिजे नाहीतर लोकं जोडय़ाने मारतील. लोक त्यांना जागेवर ठेवणार नाहीत. कोणी असला आणि तो बाळासाहेबांच्या विरोधात काही बोलला तर लोक हाणतीलच जोडा त्याच्या. म्हणून त्यांना बाळासाहेब पाहिजेत. पण आता ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं असल्याचं ठाकरे म्हणाले.
शिवाय, माझं त्यांना आव्हान आहे, ठाकरे आणि शिवसेना हे नातं - तोडून दाखवा. मात्र ते करताना माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. प्रत्येकाला आई-वडील असतात. मला माझ्या आई-वडिलांबद्दल आदर आहे. तसा प्रत्येकाला प्रत्येकाच्या आई-वडिलांबद्दल आदर असला पाहिजे. मात्र त्यांनी स्वतःच्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावीत. त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने काम करावे. मी तर म्हणेन असा आशीर्वाद दुसरा मिळू शकत नाही.
त्यांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत आणि मतं घ्यावीत. माझे वडील का चोरताय? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये. तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात. आणि माझा तर विश्वासघात केलाच, लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना? तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मागा मतं असंही ते यावेळी म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.