अंबरनाथचा राज्य महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; 7 वर्षांतील धक्कादायक आकडेवारी समोर!

आमदारांनी एमएमआरडीए आणि ठेकेदारावर फोडलं खापर..
Highway
Highwayदिलीप कांबळे

अजय दुधाणे

अंबरनाथ: अंबरनाथमधून जाणारा कल्याण कर्जत राज्य महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे. कारण, मागील ७ वर्षात या महामार्गावर तब्बल ५३ जणांचा अपघाती मृत्यू झालाय. पोलिसांनीच लेखी स्वरूपात ही आकडेवारी दिली असून मनसेचे शहर उपाध्यक्ष एहसामोद्दीन खान यांनी ही आकडेवारी समोर आणलीये. तर याबाबत आमदारांनी एमएमआरडीए अधिकारी आणि ठेकेदार यांना जबाबदार ठरवलंय.

अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर रस्त्याला काही वर्षांपूर्वी राज्य महामार्गाचा दर्जा देण्यात आला. यानंतर एमएमआरडीएच्या माध्यमातून या कल्याण कर्जत राज्य महामार्ग क्रमांक ७६ चं काँक्रीटीकरण साधारण ९ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलं. मात्र, हे काम अतिशय निकृष्ट, नियोजनशून्य आणि संथ पद्धतीनं चाललं असून आज ९ वर्षांनंतरही रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही.

Highway
Pune : शरद पवार घेणार 'दगडूशेठ'चं दर्शन; ब्राम्हण संघटनांसोबतच्या बैठकीनंतर व्यक्त केली इच्छा

एकीकडे समृद्धी महामार्गासारखे रस्ते अल्पावधीत पूर्ण होऊन खुलेही झाले, तरी अंबरनाथचा हा रस्ता मात्र अजूनही पूर्ण झालेलाच नाही. याच रस्त्याला लागलेला आणखी एक शाप म्हणजे मागील ७ वर्षात रस्त्याच्या कामामुळे, निकृष्ट दर्जामुळे, एमएमआरडीएने योग्य ती काळजी न घेतल्यामुळे या रस्त्यावर थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ५३ जणांचे अपघाती मृत्यू झालेत.

मनसेचे शहर उपाध्यक्ष एहसामोद्दीन खान यांनी पोलिसांकडून माहितीच्या अधिकारात माहिती घेऊन ही आकडेवारी समोर आणलीये. सोबतच त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केलेत. तब्बल १० वर्ष होऊनही रस्त्याचं काम पूर्ण होत नाही. डिव्हायडरला लाईटचे पोल लावले आहेत, त्यावर जाहिराती लागतायत, पण लाईट मात्र अजूनही बंद आहेत, या सगळ्यामुळे हे जे ५३ बळी गेलेत याला जबाबदार कोण आहे? असा प्रश्न एहसामोद्दीन खान यांनी विचारलाय.

तसंच, एमएमआरडीए ही राज्य सरकारच्या अखत्यारीतला यंत्रणा असून राज्य सरकारला जाब विचारण्याची जबाबदारी कुणाची आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. पुढील १५ दिवसात जर या रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही, तर अंबरनाथ तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा एहसामोद्दीन खान यांनी दिलाय.

हे देखील पहा-

या सगळ्याबाबत अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना विचारलं असता, एमएमआरडीएची संपूर्ण यंत्रणा वेगळी असली, तरी अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी, शहर अभियंता हे त्यावर मॉनिटरिंग ऑथोरिटी असल्याचं किणीकर म्हणाले. तसंच जे ५३ बळी गेलेत, त्याला सर्वस्वी एमएमआरडीएचे अधिकारी, इंजिनिअर आणि ठेकेदार जबाबदार असल्याचं आमदार बालाजी किणीकर यांनी म्हटलंय. सोबतच आपण याच रस्त्याच्या कामाबाबत एमएमआरडीएच्या आयुक्तांना तक्रार केल्याचंही किणीकर यांनी स्पष्ट केलं.

अंबरनाथमध्ये राज्य महामार्गावर गेलेल्या बळींची ही आकडेवारी प्रत्येक अंबरनाथकराला संताप आणणारी आहे. गेल्या १० वर्षांपासून या महामार्गाची जी काही अवस्था आलीये, ती पाहता हा महामार्ग अंबरनाथ शहराला मिळालेला एखादा शाप आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झालाय. १० वर्ष झाली, आजवर कोट्यवधी रुपये खर्च झाले, तरीही हा महामार्ग पूर्ण झालेला नाही. त्यामुळं हा महामार्ग आहे? की ठेकेदार आणि अधिकारी यांची रोजगार हमी योजना? असा प्रश्न प्रत्येक अंबरनाथकराला पडलाय. या सगळ्याची उत्तरं आता युक्तिवादातून मिळतात? की सुधारणेतून? हे पाहावं लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com