सुशांत सावंत -
मुंबई: पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. भाजपनेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवाय या घोटाळा प्रकरणी पवारांची (Sharad Pawar) देखील चौकशी करण्यात यावी असं पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवलं आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या आरोप पत्रामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अशातच या घोटाळ्यामध्ये राज्याच्या राजकारणातील एका मोठ्या आणि जेष्ठ व्यक्तीचा समावेश असल्याचंही ईडीने सांगितलं आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री यांनाही आरोपपत्रात आरोपी करण्यात आलं आहे. मात्र, त्यांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत.
पाहा व्हिडीओ -
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी २००७ साली पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात त्यांना सहकार्य केल्याचा दावा तपास यंत्रणेने आरोपपत्रात केला आहे. या घोटाळा प्रकरणी राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. शिवाय राऊत यांनी वारंवार मागणी करुन देखील त्यांना जामीन नाकारण्यात येत आहे. काल ईडीने राऊतांवर आणखी गंभीर आरोप केले, संजय राऊत यांचा प्रवीण राऊत यांच्यामार्फत पत्रा चाळ प्रकल्पाशी थेट संबंध असून प्रवीण राऊत हे गुरु आशीष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते.
प्रकल्पाच्या संकल्पनेपासून ते कार्यान्वित होण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत संजय राऊत यांचा सहभाग असल्याचा ईडीचा आरोप आहे. संजय राऊत यांनी यासंदर्भात म्हाडाच्या अधिकाऱ्यांसह इतरांच्या बैठकांनाही हजेरी लावली होती. अशी एक बैठक तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तर दुसरी बैठक तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली असल्याचा मोठा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.
पत्राचाळ प्रकरणात गुरूआशिष कंपनीला काम देण्यात यावे यासाठी तत्कालीन कृषीमंत्री, तत्कालिन मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती, मराठी माणसाला बेघर करण्यात शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेस जबाबदार असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार असताना हे काम देण्यात आलं असून या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) एक पत्र लिहलं असून या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, 'मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्रा चाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरु आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली.
या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळं मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, असं पत्र भातखळकरांनी फडणवीस यांना पाठवलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळणं मिळालं असून पवारांची देखील चौकशी ईडीकडून करण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.