रश्मी पुराणिक
मुंबई: मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भेट घेतली आहे. भोंग्याच्या आंदोलनानंतर मनसैनिकांवर पोलिसांकडून कारवाई होत आहे. याबाबतच ही भेट असल्याची माहिती आहे. बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी काल मुंबई सीपी आणि क्राईम जॉइंट सीपी यांची भेट घेतली होती त्यानंतर आज त्यांनी गृहमंत्र्यांची (Dilip Walse-Patil) भेट घेतली आहे. या भेटीत जवळपास २० मिनिटे चर्चा झाली. गृहमंत्र्यांनी भेट घेऊन नांदगावकर आता राज ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. यामुळे मनसे (MNS) कार्यकर्त्यांवर सुरु असलेल्या पोलीस कारवायांपासून दिलासा मिळू शकतो. (Bala Nandgaonkar meets Home Minister for Discussion on action against MNS Workers)
हे देखील पाहा -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कालच (मंगळवारी) ट्विट करून मनसैनिकांवर होणाऱ्या पोलीस कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली होती. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही, असं राज ठाकरेंनी या पत्रात नमूद करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता मनसैनिकांवर होणाऱ्या पोलीस कारवाया बंद करण्यासाठी अथवा काहिसा दिलासा मिळण्यासाठी बाळा नांदगावकर यांनी ही भेट घेतली आहे. (Bala Nandgaonkar Latest Marathi News)
४ मे ला मनसैनिकांची धरपकड
मशिदी समाेर अथवा शहरात हनुमान चालिसा (hanuman chalisa) लावण्यावरुन राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मनसेचे (mns) कार्यकर्ते आणि पाेलीस दल (police) यांच्यात खटके उडाले होते. साेलापूर (solapur), धुळे (dhule), हिंगाेली (hingoli), पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) येथे पाेलीसांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे अनेक मनसैनिक सध्या भूमिगत आहेत.
राज ठाकरेंच्या पत्रात काय?
हे पत्र ट्वीट करत राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट इशाराच दिला आहे. राज ठाकरे म्हणाले की "राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!” असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मी आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी ४ मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच त्यांची धरपकड सुरू करण्यात आली. २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या. हजारोंना तडीपार केलं. अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!” असं या पत्रात राज ठाकरे म्हणाले आहेत.
पुढे राज ठाकरे म्हणाले की, गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे, ते पाहाता मला प्रश्न पडलाय की मशिदींमध्ये ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्त्यांना पोलीस असे शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत”, असं राज ठाकरेंनी या पत्रात म्हटलं आहे. तसेच "मनसे कार्यकर्त्यांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत, हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत", असं देखील या पत्रात राज ठाकरेंनी नमूद केलं आहे.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.