
रश्मी पुराणिक
मुंबई: 'गुजराती लोक मुंबईतून गेले, तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही, असं वक्तव्य केल्यानंतर टीकेचे धनी ठरलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज, शनिवारी स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केलं. (Bhagat Singh Koshyari News Update)
मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्राबद्दल (Maharashtra) काल, शुक्रवारी मुंबईत एका कार्यक्रमात वक्तव्य केल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. मुंबईतील अंधेरी येथे चौकाच्या नामकरणाच्या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या भाषणासंदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे, असेही कोश्यारी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला. काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले, त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो, असे कोश्यारी यांनी स्पष्ट केले.
मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले- कोश्यारी
मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही, असे कोश्यारी म्हणाले.
'माझ्या वक्तव्याचा विपर्यास'
नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केले.
Edited By - Nandkumar Joshi
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.