
Prasad Lad On Shivaji Maharaj : छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपवर टीका होत असतानाच, आता आणखी एका नेत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून भाजपला अडचणीत आणलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे, असं विधान भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलं. यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. विरोधकांकडून भाजपवर टीकेची झोड उठवण्यात आल्यानंतर प्रसाद लाड बॅकफुटवर गेले आले. त्यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. (Controversial Statement On Chhatrapati Shivaji Maharaj)
राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपची आधीच अडचण झाली असताना, आता त्यात प्रसाद लाड यांच्या वक्तव्याची भर पडली आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलं आहे. काल कोकण मेळाव्याच्या आयोजनासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान या वक्तव्यावरुन टीका सुरु झाल्यानंतर प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच कालच मी माझं वक्तव्य सुधारलं होतं असं देखील ते म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरून सर्वप्रथम हा व्हिडिओ शेयर करण्यात आला होता. "दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या. शिवाजी महाराज यांच्या नावे निवडणूक लढवतात. परंतु महाराजांचा इतिहासाच यांना माहीत नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे." असं कॅप्शन देत हा व्हिडिओ शेयर करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीसह, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्याही नेत्यांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचे खंडण
यावेळी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, त्यांची तुलना कुणाचीही होऊ शकत नाही. त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला आहे हे अख्ख्या जगाला माहीत आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचं खंडण केलं आहे.
प्रसाद लाड यांच्या या वक्तव्याने आता राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी म्हणाले की, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात आज नवीन इतिहास मांडला. "छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला व त्यांचे बालपण रायगडावर गेले" .परत एकदा इतिहासाशी छेडछाड झाली आहे. भाजपनी छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का? भाजपाने आता माफी मागून चालणार नाही. त्यांनी आता नाक रगडून प्रायश्चित्त करावे, अशी मागणी केली आहे अशी मागणी त्यांनी केली आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील यांनीही प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. विनोद पाटील म्हणाले, प्रसाद लाड यांनी आता पुन्हा शाळेत अॅडमिशन घेऊन इतिहासाचे धडे घेण्याची गरज आहे. त्यांनी पहिलीच्या मुलाला शिवरायांचा जन्म कुठे झाला, हे विचारले असते तर त्यानेही अचूक उत्तर दिले असते. एखादा मनोरुग्णच असे वक्तव्य करू शकतो.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले, प्रसाद लाड जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. भाजप आणि आरएसएस (RSS) ची मंडळी वारंवार बदनामी का करत आहे हे विकृत मानसिकतेचे मनुवादी आहेत. शिवप्रेमी अशा वाचाळवीरांना जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाहीत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.