
मुंबई : राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कांदा, कापूस, धान, सोयाबीन, हरभरा, तुरीसह शेतमालाला भाव नाही; त्यातच अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने पिकांची राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे सर्व कामकाज बंद करून शेतकऱ्यांबद्दल सरकराची भूमिका काय आहे, हे कळले पाहिजे. संकटातील शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत जाहीर केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजचे कामकाज सुरू होताच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर (Farmer Issues) चर्चा व्हावी यासाठी विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. पण सरकारने तो फेटाळला. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी सभात्याग केला. या विषयावर बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, ''अवकाळी पावासाने शेतातील उभी पिके खराब झाली. (Maharashtra News)
गहू, हरभरा, फळबागा, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची भयावह परिस्थिती असताना यापेक्षा दुसरा कोणता महत्वाचा विषय आहे. सर्व प्रश्न बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे, अशी विरोधकांची मागणी होती; पण सरकारने त्यावर समाधानकारक उत्तर दिले नाही. माहिती घेऊन नंतर भूमिका मांडू अशी सरकारची मोघम भूमिका होती.''
दोन दिवसाच्या अवकाळी पावसाने शेतातील पीकं जमीनदोस्त होत असताना, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्याचवेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री धुळवड खेळण्यात मग्न होते, असा हल्लाबोलही नाना पटोले यांनी केला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण होऊ नये हीच विरोधकांची मागणी आहे. पण मागील आठवड्यातही कांदा, सोयाबीन, कापसचा प्रश्न उपस्थित केला होता. नाफेड कांदा खरेदी करत असल्याचे सरकारने सभागृहात सांगितले; पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. कांदा खरेदी होत नाही. वीज कनेक्शन कापणार नाही असे सांगितले होते पण विदर्भ विभागातच ९९९५ शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले आहे.
सरकार सभागृहात एक सांगते, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. म्हणून विरोधकांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. पण सरकारने स्थगन प्रस्ताव नाकारला. शेतकऱ्यांच्या रंगाचा बेरंग झाला असताना सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, असेही पटोले म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.