Saamana Editorial : मोदी सरकारची 9 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभरात भाजप नेत्यांकडून सरकारच्या कामाची लोकांना माहिती दिली जात आहे. देशभरात विविध कार्यक्रमांच आयोजन भाजपकडून केले जात आहे. मात्र मोदी सरकारच्या या 9 वर्षांच्या कालखंडावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुखपत्र सामनातून टीका करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, काळा पैसा वाढला, रोजगार देण्याचे वचन फसले. या सगळ्या गोष्टींमुळे जगात भारताची मान उंच झाली असे मोदींच्या अंध भक्तांना वाटणे स्वाभाविक आहे. मात्र मोदी यांची नऊ वर्षे म्हणजे देशाच्या, जनतेच्या नाकी नऊ आलेला कालखंड आहे. तो लवकर संपेल तेवढे बरे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
मोदी व त्यांचे सहकारी खोटारडे
नरेंद्र मोदी व त्यांचे सध्याचे सहकारी म्हणजे कमाल आहे. खोटारडेपणाच्या बाबतीत एकाला झाकावे व दुसऱ्याला काढावे असेच एकापेक्षा एक असे सरस लोक आहेत. मोदी सरकारला नऊ वर्षे झाली व त्यानिमित्त मोदींच्या माणसांनी खोटेपणाची बहार उडवून दिली आहे. देशभरात केंद्रीय मंत्र्यांच्या पत्रकार परिषदा सुरू आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मुंबईत आल्या व त्यांनी खोटेपणावर कळस चढवला. मोदींमुळे देशाला मान मिळाला, जगभरात भारताची मान उंच झाली वगैरे हास्यतुषार त्यांनी उडवले.
देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात व देशाच्या उभारणीत कोणतेही योगदान नसलेला राजकीय पक्ष गेल्या नऊ वर्षांपासून सत्तेवर आहे व हीच नऊ वर्षे म्हणजे देश असे त्याचे सांगणे आहे. मोदींमुळे जगात मान वाढला. म्हणजे कसा? अंध भक्तांनी मोदींविषयी अनेक कल्पित कथा पसरवल्या.
देशाला दहशतवादापासून मुक्त केले?
गेल्या एक महिन्यापासून देशातील मणिपूर राज्य हिंसेच्या आगीत पेटले आहे व शेकडो लोक त्यात मारले गेले. गृहमंत्री अमित शहा मणिपूरचा वणवा शांत करू शकलेले नाहीत. मोदींनी देश दहशतवादमुक्त केला तो हा असा काय? देशाच्या राजधानीत दिल्लीत रोज मुली व महिलांवर अत्याचार व हत्या होत आहेत. महिला कुस्तीपटू त्यांच्यावरील अत्याचारांविरोधात दिल्लीच्या रस्त्यावर एक महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. महिला कुस्तीपटूंना केंद्राचे पोलीस फरफटत पोलीस व्हॅनमध्ये कोंबत होते. हासुद्धा एक प्रकारचा सरकारी दहशतवाद आहे. त्यामुळे भारतास दहशतवादापासून मुक्त केले म्हणजे नक्की काय केले? हा सवाल आहे. (Political News)
देशातील 80 टक्के लोक आत्मनिर्भर बनू शकले नाहीत
निर्मला सीतारामन यांचे म्हणणे आहे की, ''या सरकारच्या काळात 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले ही मोदींची कृपाच आहे!'' खरं तर 140 कोटी लोकसंख्येपैकी 80 कोटी लोकांना आजही सरकारच्या रेशनवर गुजराणा करावा लागतो, ते स्वावलंबी किंवा आत्मनिर्भर बनू शकत नाहीत हा मोदींचा पराभव आहे. 80 कोटी लोक सरकारी भिकेवर जगतात यास सीतारामन विकासाचे मॉडेल मानतात काय? असा सवाल सामनातून विचारण्यात आला. (Latest Marathi News)
अनेक प्रयोग फसले
नोटाबंदीसारखे प्रयोग फसले आहेत. नऊ वर्षांत दोन वेळा नोटाबंदी करून मोदी सरकारने काय साधले? अर्थव्यवस्था ढिसाळ केली. दोन हजारांची नोट आणतात काय आणि लगेच रद्द करतात काय? सगळाच खेळखंडोबा सुरू आहे. मोदींत्या भक्तांच्या दृष्टीने 'मोदी हाच भारत व भारत म्हणजेच मोदी', पण प्रत्यक्षात हा प्राचीन देश म्हणजे एका व्यक्तीच्या हाती असलेला 'सन्गोल' म्हणजे राजदंड नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.