जयश्री मोरे
मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते भ्रष्टाचारात अडकले आहेत. त्यामुळे जनतेचा आघाडी सरकारमधील नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही. चार राज्यात यश मिळाले आहे, आता मिशन महाराष्ट्र आहे. 2024 मध्ये राज्यात स्वबळावर भाजपचे सरकार सत्तेत येईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला होता. तसेच फडणवीसांच्या या वक्तव्यावर आणि गोव्यात भाजपच्या विजयावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीसांना चिमटा काढला आहे.
फडणवीसांच्या नेतृत्वाखाली गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाने पहिल्यांदा बहुमतापर्यंत बाजी मारली यावेळी नागपुरात त्याचे स्वागत करण्यात आले, यावेळी फडणवीस म्हणाले, गोव्यात यश मिळाल्याने महाराष्ट्रातील जनतेचा भाजपावर (BJP) विश्वास बसला आहे. वर्तमान राज्य सरकार (State Government) हे घोटाळाबाजांचे सरकार आहे. रोज नवनवीन घोटाळे आणि गैरव्यवहाराची प्रकरणे समोर येत आहे, त्यामुळे आता हे सरकार कोंडीत सापडले आहे. माझ्याकडे आघाडीतील आणखी काही नेत्यांच्या विरोधात पुरावे देखील आहेत. योग्य वेळी ते बाहेरही काढण्यात येतील. गोव्यातील यशानंतर आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पुढे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) पूर्ण बहुमताने भाजपची सत्ता येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला होता.
फडणवीसांच्या या विश्वासावर काय म्हणाले राऊत?
राऊत म्हणाले, "देवेंद्र फडणवीस गोवा जिंकून आले आहेत. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे. गोवा काय आहे ते त्यांना लवकरच कळेल, कारण गोवा पोर्तुगीज यांना देखील कळला नव्हता. इंग्रजांना देखील कळला नव्हता. त्यानंतर अनेक राजकीय पक्ष ने देखील अनेक वर्ष गोवा कळला नाही. त्यामुळे लवकरच माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांना देखील गोवा काय आहे ते कळेल. गोवा जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल, पण त्यांनी प्रयत्न करावे, त्यांनी राजकीय कार्यात स्वतःला वाहून घ्यावे," असा सल्ला राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना दिला.
"पुन्हा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला येऊ देणार नाही";
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मी भाजपाला 2024 मध्ये राज्यात येऊ देणार नाही असं म्हटलं आहे. त्यासंबंधी बोलताना राऊत म्हणाले की, "जर भारतीय जनता पक्षाला (BJP) वाटत असेल केंद्रीय तपास यंत्रणा खोटे आरोप, चिखलफेक करुन विकास आघाडीचे खासदार, आमदार, नेते यांचे मनोबल ते खाली आणण्याचा प्रयत्न करणार असतील, तर ते चुकीचे आहे. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले, की घाबरू नका पुन्हा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला येऊ देणार नाही, हे केवळ राष्ट्रवादी पक्षासाठी नाही तर पूर्ण महाविकास आघाडी पक्षासाठी त्यांनी भूमिका मांडली आहे", असंही ते म्हणाले.
हे देखील पहा-
नकली रंगांवर केंद्र सरकारची बंदी - संजय राऊत
राऊत पुढे म्हणाले, "आमचे बीजेपीतले मित्र रोज तारखा देत आहेत. रोज रंग उधळत आहेत, ते नकली रंग आहेत, अशा नकली रंगांवर केंद्र सरकारची बंदी आहे. त्यामुळे काल त्यांना पवार साहेब यांनी उत्तर दिले आहे, काही झाले तरी ते पुन्हा येणार नाहीत, पण प्रयत्न करायला काही हरकत नाही", असं म्हणत संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपला आव्हान दिलं आहे.
"रेड हा त्यांचा आवडता रंग म्हणण्यापेक्षा त्यात फार भेसळ आहे, चुकीच्या रंग ते वापरतात आणि तुमच्या त्या भेसळीच्या रंगाला आम्ही घाबरत नाही, होळी वर्षातून एकदा येते पण यांचा शिमगा रोजच सुरु असतो. आम्ही जर यांचा शिमगा करायला सुरुवात केला, तर महाराष्ट्रात सुद्धा खूप खड्डे खणलेले आहेत, त्या खड्ड्यात कोण पडेल आणि कोणाला ढकलले जाईल हे तुम्हाला हळूहळू दिसेल", असा इशाराही राऊतांनी दिला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.