
Deepak Kesarkar News : 'शालेय शिक्षणात परीक्षेला खूप महत्व आहे. शासनाच्या धोरणानुसार इयत्ता आठवीपासून परीक्षा घेण्यात येते. परंतु परीक्षा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आठवी इयत्तेपर्यंत चिंता नसते. मात्र, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी 'इयत्ता तिसरीपासून परीक्षा (Exam) घेतली तर तुम्हाला आवडेल का?' असा प्रश्न शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केला. तिसरी इयत्तेपासून परीक्षा घ्यावी का? याबाबत विद्यार्थ्यांनी, तज्ज्ञांनी, अभ्यासकांनी बोलावे, त्यानुसार निर्णय घेण्यात येईल, असेही केसरकर म्हणाले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या समारोप समारंभ कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दीपक केसरकर म्हणाले, 'शाळेत विद्यार्थी शिक्षण घेताना त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडला पाहिजे. त्यासाठी त्यांच्या शालेय शिक्षणापासून सुरुवात होणे गरजेचे आहे. मी विद्यार्थी आहे. शिक्षण मंत्री झालो म्हणून ज्ञान मिळते असे नाही, ज्ञान मिळविण्यासाठी शिकावं लागते. समजून घ्यावे लागते.
'शासनाच्या निर्णयानुसार आता शाळांमध्ये आठवीपासून परीक्षा घेण्यात येते. पण इयत्ता तिसरीपासून परीक्षा घेण्याबाबत विचार सुरू आहे. 'विद्यार्थ्यांनो, तुम्हाला तिसरीपासून परीक्षा आवडेल का?, असा प्रश्न केसरकर यांनी विद्यार्थ्यांना केला.
'प्रत्येक शाळेला पीटी शिक्षक देणे शक्य नाही. चार ते पाच शाळेला एक पीटी शिक्षक देण्यासाठी पावले उचलण्यात येतील. विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास महत्वाचा आहे. योग शालेय जीवनाचा भाग कसे बनतील, याबाबत विचार सुरु आहे, असेही ते म्हणाले.
'इयत्ता सहावीपासून व्यक्तीमत्व विकासाचे धडे विद्यार्थ्यांना देण्याचा विचार आहे. क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्टता मिळवावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे धडे शालेय जीवनासापासून मिळणे आवश्यक आहे. तसेच अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापन आणि व्यवसाय प्रशिक्षण देण्याचा विचार आहे, असे केसरकर म्हणाले.
'सरकारी शाळांमध्ये सीबीएसई, आयसीएसई बोर्ड सुरू करण्याचा विचार आहे. मुख्यमंत्र्यांनी ७५ हजार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती करण्याची घोषणा केली आहे. त्याआधी अतिरिक्त शिक्षक किती आहेत, त्याचे समायोजन कसे करायचे यावर काम करण्यात येईल, असेही दीपक केसरकर म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.