- सचिन कदम
Raigad News : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठे आहे. दरवर्षी ५ लाख अपघातांमध्ये दीड लाख लोक मृत्यूमुखी पडतात. काेविड, युद्धात इतके लाेक मरत नाहीत त्यापेक्षा जास्त लोक रस्ते अपघातात मरताहेत या बद्दल दुःख वाटते. त्यामुळे महामार्गांवरील ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर उपाय योजना कराव्यात यासाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नमूद केले.
पळस्पे (जिल्हा रायगड) येथे ४१४.६८ कोटी रुपये किंमतीच्या व ६३.९०० किलाे मीटर लांबीच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे पालकमंत्री व राज्याचे मंत्री उदय सामंत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्री नितीन गडकरी यांनी भूमिपूजन केले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्याला लाभलेल्या जेएनपीटी व दिघी या दोन समुद्री बंदरांचे देशाच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान आहे. हे प्रकल्प स्थानिक तसेच राष्ट्रीय विकासात भरीव योगदान देत आहेत.
समुद्री व्यापार, पर्यटन व औद्योगिक क्षेत्राची प्रगती म्हणजेच देशाची प्रगती आणि ही प्रगती साध्य होऊ शकते ते मजबूत रस्त्यांच्या जोडणीतून. पनवेल ते कासू या महामार्गाच्या काँक्रिटीकरणामुळे प्रवास गतीमान होईल तसेच वेळेची व इंधनाची बचत होईल. वाहन चालवण्याच्या व देखभालीच्या खर्चात कपात होईल. जेएनपीटी व दिघी या दोन महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा हा मार्ग असल्याने यामुळे जल वाहतूक विकासाला चालना मिळेल.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ हा कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारा महामार्ग आहे. यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळेल. प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा हा मार्ग असल्याने औद्योगिक विकासालाही चालना मिळेल. तसेच कृषी, फलोत्पादन वाहतूक सुलभ होऊन व्यवसायाला चालना मिळेल. सुधारित रस्ता सुरक्षा प्रणालीमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. हे प्रकल्प जिल्ह्याच्या, राज्याच्याच नाही तर देशाच्या व्यापारवृद्धीत व सर्वसमावेशक प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलतील.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मंत्री गडकरींनी १५ हजार कोटी रुपयांच्या नवीन तीन प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये कळंबोली जंक्शन हा १२०० कोटी रुपयांचा प्रकल्प, पागोडे जंक्शन चौक ते ग्रीनफील्ड महामार्ग हा १२०० कोटी रुपयांचा प्रकल्प आणि मोर्बे – करंजाडे हा जेएनपीटीवरून जाणारा १३,००० कोटी रुपयांचा दिल्लीला जोडणारा महामार्ग यांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या कामांना लवकरच सुरुवात होईल अशी ग्वाही मंत्री गडकरी यांनी दिली.
दरम्यान मुंबई गाेवा रस्त्यावरुन मंत्री गडकरी यांनी काेपरखळी मारत. माझी आणि माझ्या खात्याची जबाबदारी आहे. झालं ते झाले हा महामार्ग लवकर पुर्ण हाेईल अशी ग्वाही देताे असे गडकरींनी नमूद केले.
मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- पळस्पे ते इंदापूर या मार्गाचे काम यावर्षी डिसेंम्बरच्या आत पूर्ण करण्यात येणार, आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न.
- रस्त्यावर 6- 8 इंच टॉपिंग करण्याच्या सूचना, चारपदरी मार्ग तयार करण्यात येणार.
- अपघात निवारण समिती स्थापन करणार
- दर दोन महिन्यांनी बैठक घेऊन ब्लॅक स्पॉट, अपघातस्थळची पाहणी करावी.
- राज्यात सॅटेलाईट बेस टोल तयार करण्यात येणार.
- जेएनपीटी ते दिल्ली १२ तासांत पोहचता येणार
- कळंबोली येथील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यात येणार.
- एकूण सुमारे १५ हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार.
- नवी मुंबई एअरपोर्ट येथे पोहचण्यासाठी वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रयत्न.
- कोकणातील पर्यटन वाढीसाठी ऍमफीबीअस (amphibias) सी - प्लेनचे नियोजन करण्याचा विचार.
- कोकणाचा आर्थिक, औद्योगिक विकास करण्याची गरज.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.