ठाणे : मराठी माणसाने जेव्हा मुंबई हातात घेतली, तेव्हा १०५ लोक न घाबरता बंदुकीच्या गोळ्यांना सामोरे गेले, शहीद झाले. पण आम्ही मुंबई घेतली. तेव्हा आता आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना परत बोलवा, असं म्हणणार नाही तर आता त्यांना पळवून लावू, गरज पडली तर राजभवनात घुसू. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad) यांनी दिला. (Jitendra Awhad Latest News)
भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई ठाण्याबद्दल केलेल्या विधानाचा जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'आम्ही राज्यपालांबाबत कधी बोलतच नव्हतो. मात्र असं असताना देखील त्यांनी बऱ्याच वेळा महाराष्ट्राचा अपमान केला. तरी फार मी काही लक्ष दिलं नाही. कारण मराठी माणसांना ते काय बोलतात त्याविषयी काही वाटत नाही. ज्या पद्धतीने त्यांनी महात्मा फुलेंचा अपमान केला मला वाटतं तेव्हाच त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी होती'.
'राज्यपालांना नेहमी आम्ही मानसन्मान देतो. पण आता त्यांची तशी लायकी उरलेली नाही. त्याला मराठी माणसांची किंमत समजली नाही. महाराष्ट्राचे थोर कवी, दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे म्हणतात, "ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही तर, कष्टकऱ्यांच्या तळहातावर उभी आहे", यातच मराठी माणसाची ओळख आहे'. असं म्हणत आव्हाड यांनी राज्यपालांना सुनावलं आहे. (Jitendra Awhad On Governor Bhagat Singh Koshyari)
'मुंबई मराठी माणसांच्या घामाने उभी राहिली'
ज्या दोन समाजांबद्दल राज्यपाल बोलले त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आणि प्रेम आहे. पण, गुजराती आणि राजस्थानी लोक त्यांच्या राज्यात मेहनत करून मोठे का नाही झाले, कारण इथल्या कष्टकऱ्यांनी घाम गाळला, त्या घामातनं निर्माण झालेली ही संपत्ती. आज त्यांनी या मराठी जनतेचा अपमान केला. ते कोण आहेत, कोणाचे आहेत, कशाचे आहेत काही घेणं देणं नाही. स्पष्ट भुमिका असेल प्रत्येक मराठी माणसाची वाट्टेल ते सहन करू पण मराठी माणसाच्या अस्मितेला हात घातलेला सहन करणार नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले .
'मुंबई घेताना रक्ताचे पाट वाहिलेत'
मुंबई घेताना मराठी माणसाच्या रक्ताचे पाट वाहिलेत आहे. तेव्हा मुंबईबद्दल अभिमान आणि ऋणानुबंध जुळलेले आहेत. १८७३ ला इथे पोर्ट सुरू झालं, १८७५ ला मुंबईत पहिल्यांदा स्टॉक एक्स्चेंज सुरु झालं. हा इतिहास आहे. म्हणजे देशाचं जे निव्वळ व्यावसायिक रुप आहे ते ते मुंबईने दिलंय भारताला. इथले टाटा असो, इथले बिर्ला असो, फिरोदिया असो, बजाज, मित्तल, रहेजा हे का नाही त्यांच्या राज्यात जाऊन मोठे झालेत, आमच्या राज्यात मोठे झाले. कारण हा या मातीचा गुण आहे. असं आव्हाड यांनी ठणकावून सांगितलं आहे.
'राज्यपालांनी मराठी सह्याद्रीचा अपमान केला'
'ही माती ज्याने डोक्याला लावली, तो कधी मागे बघत नाही, इथे पडलेल्याला उचलण्याची मराठी माणसाला सवय आहे. तीच मराठी माणसाची जगात ओळख आहे. आम्ही कुत्सित आहोत म्हणून ओळखले जात नाहीत, तर हे हृदय प्रसंगी हिमालयापेक्षा विशाल असतं, हिच ओळख सह्याद्रीची आहे. आज तुम्ही या सह्याद्रीचा, मराठी मातीचा अपमान केलाय. त्यामुळेच कोश्यारी यांनी माफी मागितलीच पाहिजे', असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
'ब्रिटीशांना मराठी माणसानेच कर्ज दिले होते'
गुजराती, राजस्थानी लोक महाराष्ट्रातून गेले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानीही राहणार नाही, या कोश्यारी यांच्या वाक्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखला देत कोश्यारी यांना चांगलीच चपराक लगावली.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पैशाचे मराठी माणसाला काय सांगता? नाना शंकरशेठ हा मराठी माणूस इतका गर्भश्रीमंत होता की व्यवसायासाठी ब्रिटीशही त्यांच्याकडून कर्ज घ्यायचे. ज्यांच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता त्या ब्रिटीशांना कर्ज देणारा माणूस याच मुंबईतील मराठी होता, हे कोश्यारींनी ध्यानात घ्यावे. असं देखील आव्हाड म्हणालेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.