
मुंबई: केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. देशात महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न हाताळण्यास मोदी सरकार कुचकामी ठरले आहे. केंद्र सरकारचे हे अपयश झाकण्यासाठीच हिंदू-मुस्लीम वाद उकरून काढलेला आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या नेत्यांच्या सभांना राज्य सरकारने परवानगी देऊ नये, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, ''इंधन दरवाढ, महागाईवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे करून वातावरण बिघडवण्याचे षडयंत्र असून, जे लोक राज्यातील सामाजिक एकोपा, शांतता, सौहार्द संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. संविधानाने प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे, पूजा, प्रार्थना करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. मी हिंदू आहे आणि दररोज हनुमान चाळीसा म्हणतो, पण त्याचा कधी गाजावाजा करत नाही. प्रार्थना करण्यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. आम्ही सर्वधर्म समभावाच्या आणि सर्व धर्मही तेच सांगतात. जे लोक इतर धर्मावर टीका करत आहेत, ते संविधानाला मानत नाहीत.''
धार्मिक द्वेष पसरवून मुख्य मुद्द्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे हाच भाजपचा अजेंडा आहे. पण त्यांच्या अजेंड्याला जनता बळी पडणार नाही. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला देशभरात एकही जागा जिंकता आलेली नाही. भाजपचे षडयंत्र जनतेला समजले आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, नाना पटोले म्हणाले, ''विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना याआधी सुपारीबाज म्हटले होते. आता राज ठाकरे यांनी कोणाची सुपारी घेतली आहे, हे देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील. दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेशात कायदा हातात घेऊन दंगली घडवण्यात आल्या, त्यात कोण लोक होते, हे सर्वांनी पाहिले आहे. असे प्रकार करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातही झाले; परंतु महाराष्ट्रातील सक्षम सरकारने त्यांचे हे मनसुबे उधळून लावले, असेही पटोले म्हणाले. राज्य सरकारने सर्व धर्माच्या धर्मगुरुंना बोलावून चर्चा करावी व योग्य तो मार्ग काढावा आणि महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.