नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची यावरून सध्या वाद सुरू आहे. या वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असून आज दोन्ही गटांनी निवडणूक आयोगासमोर लेखी स्वरुपात आपलं म्हणणं मांडलं. दरम्यान, शिंदे गटाने आपल्या लेखी उत्तरात एक मोठा दावा केला आहे.
खासदार संजय राऊत यांच्या धमक्यांमुळेच आमदारांना परराज्यात जावं लागलं. संजय राऊत यांच्यापासून आमदारांच्या जीवाला धोका होता, असा दावा शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर लेखी स्वरूपात करण्यात आला आहे. शिवसेनेतून उठाव केल्यानंतर आमदारांच्या जीवाला धोका होता. (Latest Marathi News)
संजय राऊत हे सातत्याने आमदारांना मारण्याच्या धमक्या देत होते. 'आमदार महाराष्ट्रात परतणे आणि फिरणे कठीण होईल, जे आमदार निघून गेले आहेत त्यांना सभागृहात येऊ द्या. मग बघू, अशा धमक्या संजय राऊत हे देत असल्याने आमदार परराज्यात थांबले, असा दावाही शिंदे गटाकडून लेखी स्वरूपात करण्यात आला आहे. (Maharashtra Political News)
एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड करत थेट गुवाहाटी गाठली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. तेव्हापासून खरी शिवसेना कुणाची हा वाद सुरू आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगासमोर युक्तीवाद करताना, शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला का गेले होते, त्यांना राज्यात का थांबता आलं नाही, असा प्रश्न केला होता. त्यावर आयोगाने शिंदे गटाला लेखी स्वरूपात उत्तर देण्याचे आदेश दिले होते.
आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटासह ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर लेखी उत्तर सादर केलं असून संजय राऊत यांच्या धमक्यांमुळे आमदार गुवाहाटीला पळून गेले असा, लेखी स्वरूपात दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
शिंदे गटाने लेखी उत्तरात काय म्हटलं?
उद्धव ठाकरे यांनी घटनेत बदल न करता स्वत:कडे पक्षाचं प्रमुख पद घेतलं. कोणत्याही राजकीय पक्षाला राज्य आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देताना लोकप्रतिनिधींना मिळालेल्या मतांची संख्या लक्षात घेतली जाते. प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देण्यासाठी 1968 च्या निवडणूक आयोग पक्ष चिन्ह आणि पक्ष च्या नियमानुसार 6-6a-6b निकष ग्राह्य धरला जातो.
राजकीय पक्षांची राज्य पक्ष म्हणून मान्यता देताना निवडणूक आयोग लोकप्रतिनिधींना मिळालेल्या मतांचा विचार करत असतो. लोकप्रतिनिधींच्या संख्येनुसार आणि त्यांना मिळालेल्या मतांचा विचार निर्णय देताना विचारात घ्यावा. हे पक्षातील विभाजन आहे.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आमदारांना वारंवार धमक्या देत होते. त्यामुळे ते परराज्यात निघून गेले आणि लवकर परत आलेच नाही, असं लेखी उत्तरही शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर सादर केलं आहे. दरम्यान, दोन्ही गटाने सादर केलेल्या उत्तरांवरून निवडणूक आयोग काय निर्णय घेतं? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.