मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. काल विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनातून थेट गुजरातमधील सुरतला गेले. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. मोठी बाब म्हणजे एकनाथ शिंदे एकटे गेले नसून त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय असलेले तब्बल ३०-३५ आमदार आणि पदाधिकारीही सुरतमधील एका हॉटेलात थांबले असल्याची सुत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदेंसारख्या मोठ्या नेत्याच्या बंडखोरीमुळे मविआ सरकारला धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं एक जूनं ट्वीट व्हायरल होत आहे. राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत सत्तेबाबत कान टोचले होते. राज ठाकरेंचं हेच ट्वीट आता व्हायरल होत आहे. (Raj Thackeray Latest News)
राज ठाकरेंचं जूनं ट्वीट -
मशिदीवरील भोग्यांच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या शेकडो मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यावरुनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं होतं. एका जाहीर पत्राद्वारे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर थेट टीका केली होती. आता एकनाथ शिंदेच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच ट्वीट महाराष्ट्रातील राजकारणावरच्या सद्यस्थितीवर तंतोतंत लागू होत असल्याची भावना मनसैनिकांची आहे. अनेक मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या त्या जुन्या ट्विटची आठवण करुन दिली आहे.
राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लिहीलेल्या पत्रात काय?
राज ठाकरेंनी १० मे ला हे पत्र लिहीलं होत. यात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट इशाराच दिला होता. राज ठाकरे म्हणाले की "राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!” असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.