
मुंबई: 'गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. राज्यपाल कोश्यारींच्या या वक्तव्यावरून वादळ उठलं असतानाच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारींना सज्जड इशारा दिला आहे. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आता आपल्याला सांगतो, असं राज ठाकरे यांनी ट्विट केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. (Raj Thackeray On Bhagat Singh Koshyari Statement on Mumbai maharashtra)
काय म्हणाले राज ठाकरे?
भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागावी, अशीही मागणी होत असून, निषेधही व्यक्त केला जात आहे. आता याबाबत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.
कोश्यारींची होशियारी? या मथळ्याखाली राज ठाकरे यांनी पत्रक काढलं आहे. आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर, बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे. म्हणून आपल्याविरुद्ध बोलायला लोक कचरतात. परंतु, आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात.
महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?
उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका, तुम्ही हे का बोलताय, हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आता आपल्याला सांगतो, असे राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राज्यपाल काय म्हणाले होते?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शुक्रवारी मुंबई आणि महाराष्ट्राबाबत केलेल्या वक्तव्याने पुन्हा वाद निर्माण झाला. 'गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही, असं ते म्हणाले होते.
'गुजराती, राजस्थानी निघून गेले तर आर्थिक राजधानी मुंबई राहणार नाही. राजस्थानी मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालये बांधली व गोरगरिबांची सेवा केली. राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे, असे सांगून जेथे-जेथे हा समाज जातो, तेथे तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो, असे ते म्हणाले होते.
'भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे. त्याग, बलिदान व सेवा यामुळेच जनतेचे प्रेम मिळते आणि म्हणून सर्वांनी समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे, असेही राज्यपाल म्हणाले होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.