Mumbai News: मागील दोन- तीन दिवसांपासून मुंबई शहरात आणि उपनगरात मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण आला आहे. संततधार पावसात सुरक्षित आणि आरामदायक वाहतूक व्यवस्था म्हणून मुंबईकरांनी मुंबई मेट्रोला आपली पसंती दर्शविली आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून मुंबई मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. (Latest Marathi News)
२४ जुलै २०२३ रोजी, २ लाख १२ हजार ४९०, २५ जुलै २०२३ रोजी २ लाख १८ हजार ६३५, तर २६ जुलै २०२३ रोजी सर्वाधिक म्हणजे २ लाख २२ हजार २९० इतकी दैनंदिन प्रवसंख्या नोंदवली गेली आहे. प्रवासी संख्येत वाढ होणे हे प्रवाशांचे मेट्रो वर असलेल्या विश्वासार्हतेच आणि कार्यक्षमतेच उदाहरण आहे.
मुंबईत गेल्या दोन - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर तसेच सर्वत्र पाणी साचले, ज्याचा परिणाम हा सार्वजनिक तसेच खाजगी वाहतुकीवर त्यासोबतच नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर झाला. शिवाय मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मात्र, विनाव्यत्यत सुरु असलेल्या मुंबई मेट्रो मुळे नागरिकांना बऱ्याच प्रमाणात दिलासा मिळताना दिसला.
मुसळधार पावसातही मुंबईकरांना अविरत सेवा पुरविणे हे स्थापित करण्यात आलेल्या मान्सून नियंत्रण कक्षाच्या उपाययोजनांमुळे शक्य झाले आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत असताना देखील मुंबई मेट्रोने विना व्यत्यय १००% सेवा सुरु ठेवण्यात यशस्वी झाली असून, नेहमीप्रमाणे दररोज २५३ सेवा चालवल्या गेल्या.
“मुंबईकरांनी मुसळधार पावसात सोईस्कर आणि पर्यावरणपूरक अशा मुंबई मेट्रोचा पर्याय निवडला याचा आम्हाला आनंद आहे. लोकांसमोरील येणारी आव्हाने आम्ही समजून घेतो आणि त्यांना त्रासमुक्त सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही तत्पर आणि प्रयत्नशील आहोत. प्रवाशांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि अशा परिस्थितीत मुंबई मेट्रोची निवड केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो," असं महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.