PM Narendra Modi to visit Mumbai on January 19 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून सरकारी पैशांतून जाहिरातबाजी केली जात आहे, ही जनतेच्या पैशांची लूट आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होऊन ६ वर्षे झाली, त्याचे काय झाले? यावर मोदींनी बोलावे तसेच महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या विषयांवरही पंतप्रधान मोदींनी बोलावे, असे नाना पटोले म्हणाले.
मोदींच्या मुंबई दौऱ्यासंदर्भात नाना पटोले (Nana Patole) यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. जी २० परिषदेसाठी मुंबई विमानतळाच्या परिसरात पडदे लावून मुंबईचे ‘खरे दर्शन’ होऊ नये याचा प्रयत्न केला होता. त्या कापड्यावर मोदींचे फोटो लावून ठेवले होते. आताही मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमासाठी मोठी जाहिरातबाजी करण्यात आली आहे. देशात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत पण पंतप्रधान मोदी त्यावर बोलत नाहीत.
राज्यात वर्षभरात जवळपास तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यावर पंतप्रधान मोदी यांनी बोलावे. महागाईने जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे या प्रश्नावरही पंतप्रधानांनी बोलले पाहिजे. भाजप सरकार अन्नदात्याची गळचेपी करण्याचे काम करत आहे, त्यावरही त्यांनी बोलावे. मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी सरकारी पैशातून जाहिराती देऊन वारेमाप प्रसिद्धी केली आहे, अशी टीकाही पटोलेंनी केली.
भारतीय जनता पक्ष हिंदू-मुस्लीम विषयावर राजकारण करत आहे. परंतु भाजपला पराभव दिसू लागल्याने आता त्यांना मुस्लीम समाजाची आठवण झाली आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लीम समाजाबरोबर संवाद वाढवण्याचे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले आहे. मुस्लीम समाजाबद्दल मोदी किंवा भाजपाला प्रेम नाही. भारतीय जनता पक्षाचा कोणताही धर्म नाही, केवळ सत्ता हाच त्यांचा धर्म आहे आणि ‘मोदी है तो मुमकीन है’, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये योग्य समन्वय आहे. तसेच काँग्रेस पक्षातही कोणताच गोंधळ नाही. नाशिक मतदारसंघात भाजपला उमेदवारही मिळाला नाही, दुसऱ्यांचे घर फोडणे हीच भाजपची परंपरा आहे. महाविकास आघाडी म्हणून विधान परिषदेची निवडणूक लढवत असून पाचही जागांवर मविआला विजय मिळेल. महागाई, बेरोजगारीने जनता त्रस्त असून शिक्षक व पदवीधर मतदार या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवतील, असेही पटोले म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, दावोसला जाऊन महाराष्ट्रासाठी मोठी गुतंवणूक आणल्याचा त्यांचा दावा आहे. पण हे फक्त सामंजस्य करार झालेले आहेत. यापूर्वीही असे अनेक करार झाले, पण त्यातील प्रत्यक्षात किती गुंतवणूक आली हे पाहणे महत्वाचे आहे. दावोसला जाऊन गुंतवणूक आणण्याआधी मुख्यमंत्री गुजरातला गेले असते तर बरे झाले असते, असा टोला पटोले यांनी लगावला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.