मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील निवासस्थान 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्याचा निर्धार करून मुंबईत आलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. राणा दाम्पत्य आज मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार होते. त्यासाठी ते मुंबईत पोहोचले. दुसरीकडे शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजावली आहे. कलम १४९ अन्वये ही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (police serves notice to navneet rana and ravi rana)
हे देखील पाहा -
खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा हे दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवास्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य हे मातोश्रीवर (Matoshri) जाण्यासाठी मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहेत.त्यांनी कोणतीही सुरक्षा न घेता विमानाने मुंबईत प्रवेश केला आहे. हनुमान चालीसा म्हणण्यासाठी राणांसोबत 500 हून अधिक कार्यकर्ते असणार आहेत. यामुळे मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवसैनिक राणा दाम्पत्याचा विरोध करण्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राणा दाम्पत्य मातोश्रीवर पाहोचार का हे काही वेळातच स्पष्ट होईल.
नेमकं काय आहे प्रकरण?
हनुमान जयंतीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानावर जाऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करणार असल्याचं वक्तव्य अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलं होतं. राणा यांच्या आव्हानानंतर शिवसेनेने (Shivsena) देखील आक्रमक पवित्रा घेतला होता. याबाबत धार्मिक तेढ पसरवून दंगल माजवायची आहे का? असा प्रश्न मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणा यांना विचारला होता. तर राणा दाम्पत्यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी निदर्शने देखील केली होती. मात्र तरीही राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यानं राजकारण तापलं आहे.
किशोरी पेडणेकरांची टीका
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, शिवसैनिकांची माथी भडकवण्यासाठी हे दाम्पत्य मुंबईत आलं आहे. मुंबईत त्यांना दंगल घडवायची आहे. हे दाम्पत्य अपक्ष आहे. दुसऱ्याच्या जीवावर निवडून येतात. पैशांच्या जोरावर निवडून येतात, माज करतात. आता वाय सुरक्षा मिळाली आहे. त्यामुळे त्यांना देशभरात भ्रमंती करायची आहे. जिथे भाजपचं सरकार नाही, तिथेच हे लोक भ्रमंती करणार हे लिहून ठेवा. हे दाम्पत्य असंच बरळत राहणार आणि मुंबई-महाराष्ट्र अस्थिर करणार. शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या संयमी आणि सुसंस्कारी नेतृत्वात काम करतायत. त्यामुळे शिवसैनिक हे संयमी आहेत असं पेडणेकर म्हणाल्या. (Kishori Pednekar on Rana Couple)
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.