
मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री नगरविकास एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या बंडाची सर्वाधिक झळ शिवसेनेला बसल्याचे सध्या तरी चित्र दिसत असल्याचे बोलले जाते. यात सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष भाजपही अजूनही वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत आहे. मात्र या सगळ्यात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक वेगळीतच बाजू मांडली आहे. मविआ सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यावर असताना "गेम अजूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हातात आहे" असा दावा त्यांनी केला आहे. तसेच बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे हतबल आहेत आणि भाजप त्यांच्या हतबलतेचा फायदा घेत आहे असा आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे. साम टीव्हीशी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी अनेक दावे करत त्यांनी केलेल्या ट्विटबाबतही स्पष्टीकरण दिलं आहे. (Prakash Ambedkar On Eknath Shinde)
हे देखील पाहा -
प्रकाश आंबेडकर साम टीव्हीशी बोलतांना म्हणाले की, भाजपचा जो दावा आहे की आम्ही हिंदुत्वाचे प्रतिनिधी आहोत आणि आमच्याशिवाय कुणी नाही ते सिद्ध करण्याची भाजपला संधी आहे. या राजकीय परिस्थितीत शांत का बसले आहेत याचं कारण मी दिलं. एकनाथ शिंदेंची बैठक अजून झाली नाही, राष्ट्रवादीची बैठक पुढे ढकलली, मुख्यमंत्र्यांची बैठक पुढे ढकलली याचं कारण काय? एकनाथ शिंदेंना अजून गट स्थापन केल्याचं पत्र द्यावं लागेल, तेव्हा दोन्ही बाजूने सह्यांचं व्हेरिफिकेशन होईल. माझ्या मते परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे. जेव्हा सह्यांची पडताळणी होईल तेव्हा दोघा-तिघा आमदारांनी जरी सह्या मागे घेतल्या तर ३७ हा मॅजिक फिगर पुर्ण होत नाही. त्यामुळे हा गेम पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येतो असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. (Political Crisis In Maharashtra)
एकनाथ शिंदेंचासुद्धा सदाभाऊ खोत किंवा जानकर होईल का? यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मर्जर (विलीनीकरण) झालं तर ते कदाचित एकनाथ शिंदेंना बरोबर घेतील पण जर युती झाली तर जे इतरांचं होतं तेच एकनाथ शिंदेंचं होईल. भाजपने हरियाणामध्ये तेच केलं, मध्य प्रदेशात तेच केलं आता महाराष्ट्रातही तेच चाललंय. आमदार फोडायचे, त्यांना राजीनामा द्यायला लावायचा आणि पुन्हा निवडून आणायचं हेच त्यांचं (भाजपचं) महाराष्ट्रात चाललंय. पण, भाजप स्वतः कबूल करत नाही की हे आम्ही केलं असा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. आसामच्या पुराबाबत कॉंग्रेस भाजपविरोधात भूमिका का घेत नाही अशी टीका त्यांनी यावेळी कॉंग्रेसवर केली आहे.
जर एकनाथ शिंदे गट भाजपमध्ये विलीन झाला तर काय? यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कोणत्याही आमदाराला आपली टर्म अर्धवट राहू नये असं वाटतं. पण सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. एकनाथ शिंदे आताही हतबल आहेत. त्यांच्या या हतबलतेचाच फायदा भाजप घेत आहे. नंतरही ते हतबल होतील पण, पहिल्याच हतबलेमध्ये जर सगळं खाता येत असेल तर भाजप का सोडेल? असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.