
मुंबई(Mumbai) : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्ष, पक्षचिन्ह यावरून शिंदे आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु आहे. यासोबत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या नावाचा वापर करुनही राजकारण केलं जात असल्याचं दिसून येतंय. आज बाळासाहेब ठाकरे यांनी पुण्यतिथी. यानिमित्त शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाजप(BJP) आणि शिंदे गटावर (Shinde Group) जहरी टीका करण्यात आली आहे.
आम्ही मोदींची माणसे ही कबुली दिल्याने शिवसेनेनेच बाप कोण हा प्रश्न निकाली लागला आहे. विधान भवनात बाळासाहेबांचे तैलचित्र बसवणे हे ढोंग आहे. म्हणूनच आजच्या दिवशी निर्धार केला पाहिजे बाळासाहेबांच्या नावाने सुरू केलेला ढोंगाचा बाजार कायमचा गाडण्याचा ,संपवण्याचा. काशीच्या हरिश्चंद्र घाटावर यांची राजकीय चिता पेटेल हीच बाळासाहेबांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र आदरांजली, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. (Balasaheb Thackeray Birth Anniversary)
सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
शिवसेनाप्रमुखांच्या आजच्या जन्मदिनी एक निर्धार प्रत्येकाने केलाच पाहिजे, तो म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या नावे सुरू झालेला ढोंगाचा बाजार कायमचा गाडण्याचा व संपवण्याचा . शिवसेनेच्या नावावर उतलेले - मातलेले मंबाजी , त्या मंबाजी मंडळाचे ' खोके ' राजकारण , त्या राजकारणातून सुरू असलेली महाराष्ट्राची बदनामी , त्या बदनामीतून खचलेल्या मराठी मनास उभारी देण्याचे काम शिवसेनेला करावे लागेल . मंबाजीने बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगितला , पण मोदींसमोर गुडघे टेकून सांगितले , '' आम्ही शिवसैनिक होतो हे ढोंग होते . त्यामुळे साहेब आम्ही तुमचेच !'' अशी कबुलीच दिल्याने शिवसेनेचा बाप कोण ? हा प्रश्नच निकाली लागला . बाळासाहेबांच्या जन्मदिनी गंगेच्या प्रवाहातील ओंडके आपोआप दूर झाले व काशीच्या हरिश्चंद्र घाटावर पोहोचले . त्या घाटावर हरामखोरांची राजकीय चिता पेटेल हीच बाळासाहेबांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र आदरांजली !
सध्या महाराष्ट्रात एक भलतेच राजकारण सुरू झाले आहे. त्यात शिवसेनाप्रमुखांची चोरी करण्याचा विषय प्रामुख्याने आहे, पण या चोरीमारीस देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री वगैरे लोकांनी हातभार लावावा याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्राला ढोंग मान्य नाही. शिवसेनाप्रमुख तर नेहमीच ढोंगबाजांच्या कंबरडय़ात लाथा घालीत राहिले. ढोंगबाजांचे मुखवटे त्यांनी जाहीरपणे फाडले, पण गेल्या पाचेक महिन्यांत महाराष्ट्रात ढोंगबाजीने कहर केला आहे. शिवसेनेचे मुखवटे लावून काही मंबाजी सत्तेत घुसले व त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला. पुन्हा या चोरीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी चोरांना पाठबळ व कवच देण्याचे काम देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री करताना दिसत आहेत.
देशाचे सर्व प्रमुख स्तंभ व यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत.एक प्रकारची मनमानी सुरू आहे. देशात अराजक येईल, असा इशारा बाळासाहेबांनी आधीच देऊन ठेवला होता. बाळासाहेबांचे हे भाकीत दुर्दैवाने मोदी-शहा राजवटीत खरे ठरत आहे. मोदी हे पंतप्रधान म्हणून चार दिवसांपूर्वी सर्व लवाजमा घेऊन मुंबईस आले. त्यांनी म्हणे अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण केले. त्यांनी मुंबईच्या विकासासाठी काही घोषणा केल्या. ज्या मोदी सरकारने दोन महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रातून सवादोन लाख कोटींचे उद्योग बाजूच्या गुजरात राज्यात पळवले, त्यांनी मुंबईत येऊन विकासावर भाष्य करावे हे ढोंग नाही तर काय? मोदी यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर फक्त भाजपचाच बोलबाला होता.
भाजपने एक पेंढा भरलेला कोल्हा खुर्चीवर बसवला आहे व त्या कोल्हय़ास काडीमात्र किंमत नाही. शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्याने व्यासपीठावर जो अपमान सहन केला, अशांना बाळासाहेबांचे कटआऊट वगैरे लावून ढोंगबाजीचे प्रदर्शन करण्याची गरज नाही. त्यांचे बिंगच उघडे पडले. लाचारी व गुलामीची हद्द पार करीत त्यांनी भाजपच्या व्यासपीठावरूनच जाहीर केले, ''होय, होय, आम्ही मोदींची म्हणजे मोदींची माणसं आहोत?'' इतके सर्व स्पष्ट झाल्यावर लोकांना कळलेच असेल की, शिवसेना खतम करण्याचे किती मोठे कारस्थान भाजप व त्यांच्या हस्तकांनी रचले होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.