
Sanjay Raut News : शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत काल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील 'भारत जोडो' यात्रेत सामील झाले. 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झाल्यानंतर आज, संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या 'सामना' मुखपत्रातील रोखठोक सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदींी यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
'राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतोय म्हणून पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या पटेल चौकात 'रोड शो' केला. याला काय म्हणावे, असा सवाल संजय राऊत यांनी केला. (Latest Marathi News)
संजय राऊत (Sanjay Raut) यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजप नेत्यांवर हल्लाबोल सुरूच आहे. आज, रविवारी 'सामना'च्या रोखठोक सदरातून राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
'पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीच्या पटेल चौकापासून ‘रोड शो’ केला. मंगळवारी दिल्लीचे रस्ते त्यामुळे काही काळ जाम झाले. लोकांना अडकून पडावे लागले. भाजपची एक बैठक दिल्लीच्या एनडीएमसी कन्व्हेंशन सेंटरमध्ये झाली. त्या बैठकीसाठी आपले पंतप्रधान पोहोचले ते रस्त्यावर प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत. याची गरज होती काय? पण भाजपने हे शक्तिप्रदर्शन केले ते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेस प्रत्युत्तर देण्यासाठी, अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो’ दिल्लीतील यात्रेतवर भाष्य करताना राऊत म्हणाले, ' राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे दिल्लीत प्रचंड जोशात स्वागत झाले. देशभरात राहुल गांधींच्या स्वागतास प्रचंड गर्दी उसळत आहे. त्या गर्दीस उत्तर देण्यासाठी भाजपने पंतप्रधान मोदींना रस्त्यावर उतरवून दिल्लीत शक्तिप्रदर्शन केले असेल तर तो मोदींच्या लोकप्रियतेने राहुल गांधींचा घेतलेला धसका आहे'.
'वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे राहुल गांधींच्या यात्रेस प्रसिद्धी द्यायला तयार नाहीत. कारण त्यांच्यावर तसा दबाव आहे, पण त्याच वेळी पंतप्रधानांच्या ‘रोड शो’ला प्रसिद्धी मिळते. भारतीय जनता पक्षाच्या सरकारांनी ‘मीडिया’वर कधीच निर्बंध लादले नाहीत. मग सरकार अटलजींचे असो नाहीतर मोदींचे, या राजनाथ सिंह यांच्या विधानातील पह्लपणा समोर येतो', असे ते म्हणाले.
स्वातंत्र्यपूर्व काळातील महापुरुषांची आठवण करून देताना संजय राऊत म्हणाले, 'स्वातंत्र्यपूर्व काळात टिळकांपासून गांधींपर्यंत अनेक नेत्यांच्या भोवती गर्दीचे वलय होते. ते सर्व अकृत्रिम होते. 8 डिसेंबर 1917 च्या ‘संदेश’पत्रात लोकमान्य टिळकांच्या मथुरा दौऱ्याचा सविस्तर वृत्तांत आहे. ‘मथुरेत लोकमान्य’ या मथळय़ाखेरीज ‘टिळकांची उचलपागडी’ (उचलबांगडी नव्हे!) अशा मथळय़ाचे स्वतंत्र वृत्त आहे. ते वृत्त देताना वार्ताहर लिहितो की, ‘गाडीवर इतकी अफाट गर्दी लोटली की, टिळकांना गाडीतून उतरणे आणि बाहेर काढणे अशक्य झाले. तेव्हा पुढे असलेल्या लोकांनी टिळकांना उचलले'.
'प्रचंड जनसमुदायात फक्त एक पगडी दुरून दिसत होती. टिळकांचे काही सामान गाडीतच राहिले. त्यांचे उपरणे ‘प्रसाद’ म्हणून एकाने नेले,’ असे वर्णन वार्ताहराने केले आहे. घोडय़ाची गाडी बाहेर त्यांना नेण्यासाठी उभी होती, परंतु गाडीला घोडे नव्हते. ती लोकांनी खेचत नेली. मथुरेचे शेठ भरोसीलाल हे स्वतः टिळकांच्या स्वागतासाठी उभे होते. ते ठरवून केलेले शक्तिप्रदर्शन नव्हते, असे त्यांनी पुढे म्हटले.
'प्रचाराची, प्रसाराची, प्रसिद्धीची कोणतीही माध्यमे नसताना टिळक – गांधींसाठी गर्दी उसळत असे. आज टिळक-गांधी असते तर त्यांच्या भोवती उसळलेल्या गर्दीची बोटभर बातमी तरी आली असती काय याची शंका वाटते. राहुल गांधींची दखल घेत नाही, असे सांगणारे राहुल गांधींना उत्तर म्हणून दिल्लीत गर्दीचा ‘रोड शो’ करतात व त्याची मात्र वारेमाप प्रसिद्धी होते, अशी टीका राऊत यांनी केली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.