मुंबई : पहिली ते आठवी-नववीच्या अनेक परीक्षा पूर्ण होत असतानाच शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने एप्रिल अखेरपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नव्या आदेशामुळे शाळांना मिळणारी उन्हाळी सुट्टी लांबणीवर पडणार आहे. (Schools In Maharashtra To be Operated till April End)
आतापर्यंत शाळांकडून (Schools) करण्यात आलेले उन्हाळी सुट्ट्यांतील नियोजनही बिघडणार असल्याने त्याविरोधात शाळा, शिक्षक, संस्थाचालक आणि पालकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाने (Education) राज्यातील शाळा कोरोनामुळे उशिरा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि पुन्हा उजळणी घेण्यासाठी एप्रिलअखेरपर्यंत पूर्णवेळ शाळा सुरू ठेवण्यासाठी शासन निर्णय जारी केला आहे.
त्यामध्ये राज्यातील पहिली ते नववी-अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये दररोज १०० टक्के विद्यार्थी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मार्चपासून एप्रिल अखेरपर्यंत पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग पूर्णवेळ सुरू राहणार आहेत. त्यात रविवारी शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय ऐच्छिक असून त्यासाठी आवश्यकता भासल्यास संस्था आपल्या शाळा सुरू ठेवू शकतील.
दरम्यान, मुंबईसह राज्यातील बहुतांश शाळांमध्ये पहिली ते नववीच्या विविध परीक्षा अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. काही शाळांतील परीक्षा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. काही शाळांनी परीक्षा उरकून उन्हाळी सुट्टीचे नियोजनही केलेले आहे. अशा स्थितीत राज्यातील एकूण परिस्थितीची माहिती घेऊन शालेय शिक्षण विभागाने जीआर काढणे आवश्यक होते; मात्र तसे केले नसल्याने त्यावर महाराष्ट्र शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी आक्षेप घेतले आहेत.
त्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण होईल, असा दावा शिक्षक संघटनांनी केला आहे. दुसरीकडे पालक वर्गांमध्ये त्याविषयी नाराजीचे सूर उमटले आहेत. शिक्षण विभागाने नव्या आदेशात यंदा शाळांच्या वार्षिक परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यावर शिक्षक परिषदेने आक्षेप घेतले आहेत.
पालकांना अडचणीत टाकणारे आदेश
दरवर्षीप्रमाणे शालेय कामकाजाच्या नियोजनानुसार २० मार्चनंतर शाळांच्या तोंडी, प्रात्यक्षिक व वार्षिक लेखी परीक्षांची सुरुवात होते. अगोदरचे नियोजन गृहीत धरून अभ्यासक्रम पूर्ण केला गेला आहे. आता परीक्षा सुरू झालेल्या आहेत. नेहमीप्रमाणे साधारण १५ एप्रिलपर्यंत शाळांचे मूल्यमापन आणि ३० एप्रिलपर्यंत निकाल घोषित होतो. अशा स्थितीत शालेय शिक्षण विभागाने दिलेले आदेश राज्यातील शाळा, शिक्षक व पालकांना अडचणीत टाकणारे आहेत, अशी प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.
Edited By - Amit Golwalkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.