
मंगेश कचरे, बारामती
Sharad Pawar On Kasba Bypolls Result : राज्यात नुकताच कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. तर भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला. या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. देशाचे चित्र बदलत आहे, असे ते म्हणाले. (Latest Marathi News)
शरद पवार म्हणाले की, 'मला वाटत आहे की, बदलाचे वातावरण तयार होताना दिसत आहे. अलीकडेच निवडणुका झाल्या. विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकाही झाल्या. जवळपास सगळीकडे भाजपला एखादी जागा सोडली, तर अन्य कुठेही जागा मिळू शकली नाही. सरकार त्यांचं, सत्तेच्या वापर त्यांचा हे या निवडणुकीत दिसून आले. पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही. ते जगजाहीर आहे. त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही. मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये देशाचे चित्र बदलत आहे.'
पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालावरही शरद पवार यांनी स्पष्टपणे मत मांडले. कसबा पोटनिवडणुकीबद्दल मी माहिती घेतली. त्याच्यामध्ये दोन ठिकाणी अधिक मते मिळाली आहेत. हा बदल आहे तो पुण्यात होत आहे. याचा अर्थ लोक वेगळ्या विचाराच्या प्रक्रियेत आहेत, असे शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये 12 जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये दोन क्रमांकाची मते घेणारा पक्ष ठरला आहे. सत्ताधारी पक्ष आहे, त्यांच्या सरकारमध्ये मान्यताप्राप्त विरोधी पक्ष हे राष्ट्रवादीकडे आहे. आमच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी वाधवान यांना नागालँडमध्ये पाठवले आहे. तिथे काय करावं यासंबंधीची माहिती आणि त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ. मी नागालँडच्या जनतेचा आभारी आहे, असे शरद पवार म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या संबंधीच्या ज्या शंका आमच्या सहकाऱ्यांनी उपस्थित केल्या होत्या, त्या निवडणूक आयोगाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल केला. त्याच्यामध्ये नियुक्ती करताना सरन्यायाधीश आहेत. पंतप्रधान आहेत आणि मुख्य म्हणजे विरोधी पक्ष नेता या सर्वांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले आणि हा लोकशाहीमधील चांगला निर्णय आहे.
कांदाप्रश्नी शरद पवार यांनी भाष्य करताना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. मी दोन दिवसांपूर्वी नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर होतो. यावेळी मला शेतकऱ्यांनी कांदा फेकून दिल्याची माहिती दिली. काही ठिकाणी कांदा फेकून दिल्याने अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही सत्तेत असताना देखील कांद्याच्या बाजारभावाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी सरकारने आणि नाफेडने कांदा खरेदी केला आणि त्याच्यातून अधिकचा आर्थिक बोजा उचलला. सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार याबाबत अपयशी ठरले आहे, असे शरद पवार म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.