मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपसह शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला. भाजपचे मुख्यमंत्री बोम्मई महाशयांनी महाराष्ट्रातील जत, अक्कलकोट वगैरे गावे कर्नाटकात खेचण्याची भाषा केली आहे. महाराष्ट्र अस्मितेचा हा असा घोर अपमान होऊनही ‘खोके’ गटाचा एकही स्वाभिमानी आमदार उसळून उठलेला दिसत नाही. भाजपचे आमदार व मंत्री यावर मराठी बाण्याची खणखणीत भूमिका घेतील ही अपेक्षाच करू नये, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर बोलताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनी या प्रश्नाचे खापर पंडित नेहरूंवर फोडलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद ही खरे तर दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची देणगी आहे, असं सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटलं आहे. यावरून सामनातून (Shivsena) सुधीर मुनगंटीवर यांना प्रश्न विचारण्यात आला आहे.
नेहरूंची चूक पंतप्रधान मोदी का सुधारत नाहीत?
नेहरूंनी केलेली चूक तुमचे जोरदार पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) का सुधारत नाहीत? मोदी हे रशिया आणि युक्रेन युद्धात मध्यस्थी करतात, तोडगा काढतात; पण बेळगावातील सीमा बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांवर बोलत नाहीत. मराठी बांधवांवरील अन्याय रोखू नये यासाठी मोदी सरकारचे हात व तोंड नेहरूंनी बांधून ठेवले आहे काय? असा सवाल सामनातून भाजपला करण्यात आला आहे.
एकाही भाजप पुढाऱ्याने धिक्कार तरी केला आहे काय?
बेळगावात सुरू असलेल्या मराठी बांधवांवरील अत्याचाराविरुद्ध महाराष्ट्रातील एकाही भाजप पुढाऱ्याने धिक्कार तरी केला आहे काय? बेळगाव-कारवारसह सीमा भाग महाराष्ट्रात आलाच पाहिजे, अशी गर्जना भाजपच्या मंडळींनी केल्याचे दिसत नाही. बेळगाव-कारवारसह संपूर्ण सीमा भाग महाराष्ट्रात यावा असे महाराष्ट्र भाजपला खरेच वाटत आहे काय? ही शंकाच आहे, अशी टीकाही सामनातून करण्यात आली.
मुख्यमंत्री शिंदे किती वेळा बेळगावला गेले?
मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हणे कधीकाळी सीमा भागात जाऊन आंदोलन केले असे सांगतात, पण गेल्या अनेक वर्षांपासून या महाशयांकडे सीमा भागाचा कार्यभार होता. ते किती वेळा बेळगावला गेले? गेल्या चारेक महिन्यांपासून ते मुख्यमंत्री आहेत. काय केले त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी? असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांना सामनातून विचारण्यात आला.
शिंदेंना ज्योतिषगिरीतून वेळ मिळाला असेल तर...
मुख्यमंत्र्यांचे रोज चार तास तंत्र-मंत्र व ज्योतिषगिरीत जात आहेत, पण सीमा बांधवांचे भविष्य आणि भवितव्य तसेच अंधकारमय आहे. त्यांचे कानडी टाचांखाली चिरडणे व भरडणे संपलेले नाही. तंत्र-मंत्र व ज्योतिषगिरीतून वेळ मिळाला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा कठोर समाचार घेतला पाहिजे, असा सल्लाही सामनातून मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.