
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी पुन्हा गुवाहाटी दौरा केला. गुवाहाटीला जाऊन शिंदे गटाने कामाख्ख्या देवीचं दर्शन घेतलं. दरम्यान, शिंदे गटाच्या या दौऱ्यावर शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनातून जोरदार टीका करण्यात आली. पडद्यामागील हालचाली पाहता विद्यमान मुख्यमंत्री माजी होण्याची चिन्ह स्पष्ट दिसताहेत. त्यांना शिल्लक आमदारांसह गुवाहाटीतच राहावं लागेल, त्याची सोय ते जाता जाता करताहेत, अशी टीका सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर करण्यात आली. (Latest Marathi News)
'महाराष्ट्रातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, आनंद, सुख-समृद्धी मिळावी असा नवस कामाख्या देवीच्या चरणी केल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात, पण महाराष्ट्रावरील खरे संकट मुख्यमंत्री व त्यांचा गद्दार मिंधे गट हेच आहे. तेव्हा हे संकट देवी लवकरात लवकर दूर करेल व महाराष्ट्राला सुखाचे, आनंदाचे, स्वाभिमानाचे दिवस आणेल याविषयी आमच्या मनात शंका नाही. देवी एकदम कडक आहे याची प्रचिती येईलच', असं सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे. टीका सामनातून करण्यात आली आहे.
'महाराष्ट्रात अनेक प्रश्नांचे थैमान सुरू आहे. शेतकरी, बेरोजगार तरुण हवालदिल झाले आहेत. ‘गोवर’च्या साथीने शेकडो मुले बेजार झाली आहेत. राज्य आर्थिक डबघाईला आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर व सांगलीतील ‘जत’वर दावा सांगून खळबळ उडवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर घाणेरडय़ा पद्धतीने चिखलफेक सुरू असल्याने राज्याची जनता अस्वस्थ तितकीच संतप्त आहे'.
'असे सगळे घडत असताना राज्याचे मिंधे मुख्यमंत्री त्यांच्या गटाच्या तीसेक आमदारांसह गुवाहाटी येथील कामाख्या देवीचा नवस फेडण्यासाठी गेले. मुंबईतून विमाने भरभरून माणसे नेली व तेथे नवस फेडले. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ‘कामाख्या’ देवीचे दर्शन घेतले, पण दुसऱया दिवशी परत मुंबईकडे येताना त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव आणि चिंता स्पष्ट दिसत होती', असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.
'महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांची अखंड बदनामी सुरू आहे. शिवरायांचा महाराष्ट्र तोडण्याची भाषा कर्नाटकचे मुख्यमंत्री करीत आहेत. तेव्हा नवस बोलायचा तर तो या महाराष्ट्रद्रोही लोकांना धडा शिकविण्यासाठी बोलायला हवा, पण त्याऐवजी या मंडळींनी नवस केला आहे आणि बळी दिलाय तो आपली सत्ता टिकविण्यासाठी. मग या मंडळींना देवीचा आशीर्वाद कसा मिळणार?, असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
'आसामच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक मुख्यमंत्री श्री. मिंधे यांनी केले. आसामात महाराष्ट्र भवन व महाराष्ट्रात आसाम भवन निर्माण करण्याबाबत ते बोलले. एपंदरीत पडद्यामागच्या हालचाली पाहता मुख्यमंत्री लवकरच माजी होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. त्यानंतर त्यांना त्यांच्या शिल्लक गटासह आसामातच राहावे लागेल. त्याची सोय ते जाता जाता करीत असावेत. त्यामुळे कामाख्या देवीच्या नावाने भलते-सलते उद्योग करू नका. खोके सरकार व आता रेडय़ांचे सरकार म्हणून आपण मशहूर झाला आहात हा देवीचाच कोप म्हणायला हवा', अशी टीका सामनातून करण्यात आली.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.