Saamana Editorial on Odisha Train Accident: ओडिशामधील बालासोर येथील भयंकर रेल्वे अपघाताने संपूर्ण देशच स्तब्ध झाला आहे. या घटनेनं अनेकांच्या काळजाचा थरकाप उडवला आहे. आतापर्यंत या अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ९०० प्रवाशी गंभीर जखमी आहे. दरम्यान, या अपघातानंतर शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. (Latest Marathi News)
बालासोर येथील भयंकर रेल्वे अपघाताने देशवासीयांची मने हेलावून गेली आहेत. त्याचवेळी सुरक्षित रेल्वे प्रवासाचे दावे फोल ठरल्यामुळे संतापाचा ज्वालामुखीही प्रत्येकाच्या मनात खदखदत आहे. मोदी सरकारने रेल्वे अपघातविरोधी ‘संरक्षण कवचा’च्या टिऱ्या बडविल्या होत्या. मात्र बालासोरच्या रेल्वे अपघाताने त्याच्या ठिकऱ्या उडविल्या आहेत, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.
मोदी सरकार (PM Narendra Modi) आल्यापासून रेल्वेचा विकास आणि सुरक्षितता यासंदर्भात जे दावे ठोकले जात आहेत, त्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही दुर्घटना आहे. बुलेट ट्रेन, ‘वंदे भारत’ ट्रेन्स असे रेल्वे विकासाचे बरेच फुगे गेल्या सहा-सात वर्षांत हवेत सोडले गेले. त्या सर्व फुग्यांमधील हवा शुक्रवारच्या अपघाताने काढली आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली.
"दोन रेल्वेंमध्ये टक्कर होऊ नये यासाठी ‘संरक्षण कवचा’चा उदोउदो रेल्वेमंत्र्यांनी गेल्या वर्षी केला होता. हे संरक्षण कवच म्हणजे रेल्वे दुर्घटना रोखणारी मोठी क्रांती (भक्तांच्या भाषेत ‘मास्टर स्ट्रोक’) असून एकाच रेल्वेमार्गावर समोरासमोर ट्रेन्स आल्या तरी या संरक्षण प्रणालीमुळे त्या आधीच थांबतील आणि टक्कर टळेल असे सांगितले गेले होते". (Maharashtra Political News)
"स्वतः रेल्वेमंत्र्यांनी त्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते. मग तरीही शुक्रवारची भीषण रेल्वे दुर्घटना घडलीच कशी? दोन नव्हे, तर तीन-तीन रेल्वेगाडय़ांची टक्कर येथे झाली. कुठे गेले तुमचे ते ‘संरक्षण कवच’? जनतेला दाखविलेली ही ‘कवचकुंडले’ फक्त रेल्वेमंत्र्यांनी प्रात्यक्षिक दाखविलेल्या रेल्वे गाडय़ांनाच होती, असे आता म्हणायचे का? असा सवालही सामनातून करण्यात आला आहे.
संरक्षण कवचाचा वापर टप्प्याटप्प्याने वाढवत नेला जाईल, या तुमच्या आश्वासनाचे काय झाले? अपघातग्रस्त गाडय़ांना ती प्रणाली असती तर कदाचित शुक्रवारची भयंकर दुर्घटना टळली असती आणि अनेकांचे प्राण वाचले असते. मात्र सरकारच्या सुरक्षित रेल्वे प्रवासाच्या या क्रांतीचे बिगुल बालासोरमधील अपघातग्रस्तांच्या किंकाळय़ा, आक्रोश, मरणप्राय वेदना आणि दुःखावेगात विरून गेले आहेत. असा चिमटा देखील मोदी सरकारला काढण्यात आला आहे.
पंतप्रधानांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली, जखमींची विचारपूस केली, सांत्वन केले, मदतकार्य करणाऱ्या यंत्रणांना धीर दिला, हे सगळे ठीक असले तरी सरकार म्हणून तुमच्या उत्तरदायित्वाचे काय? नुकसानभरपाईच्या रकमा आणि सहवेदना हे ना या प्रश्नाचे उत्तर आहे ना प्रायश्चित्त. या भीषण आणि भयंकर दुर्घटनेचे (Train Accident) प्रायश्चित्त सरकार घेणार की नाही? अपघातग्रस्तांच्या किंकाळय़ा, आक्रोश आणि त्यांच्या कुटुंबीयांनी फोडलेला टाहो हाच सवाल करीत आहे. असंही सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.