कोल्हापूर: शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज, सोमवारी त्यांची ही यात्रा कोकणातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि नंतर थेट कोल्हापूरात (Kolhapur) पोहचली. यावेळी झालेल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांची अटक, शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) अशा अनेक विषयांवर सडेतोड भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतला. मी लहानपणापासून अनेक राज्यापालांना भेटलो, पण एवढा राजकीय राज्यपाल मी आत्तापर्यंत बघितला नाही अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर केली आहे. (Aaditya Thackeray Latest News)
हे देखील पाहा -
आदित्य ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, सत्तेचं राजकारण निर्लज्ज्यपणे सुरू आहे. काल-परवा राज्यपाल महोदय जे बोलले ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. याआधीही राज्यपाल छत्रपती शिवरायांबद्दल बोलले, सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलले, परवा जे बोलले ते किती घातक बोलले. मी लहानपणापासून राजभवनावर जात आलेलो आहे. माझ्या आजोबांसोबत, वडिलांसोबत अनेक राज्यपालांना भेटलो आहे, अगदी वाजपेयी साहेबांना अनेक पंतप्रधानांना भेटलो आहे. डॉ. पी. सी अलेक्झांडरपासून अगदी विद्यासागर राव अशा सगळ्या गव्हर्नरला भेटलो आहे. पण, कधीही एवढा राजकीय राज्यपाल मी बघीतलेला नाही असा सणसणीत टोला आदित्य ठाकरेंनी राज्यपालांना लगावला आहे. (Shivsena Shivsanvad Yatra In Kolhapur)
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, हेच राज्यपाल काल काय बोलले जिथे निवडणुका येऊ घातल्यात तिथे मराठी आणि इतरांमध्ये फूट पाडायची यासाठी हे सुरू आहे. स्वाभिमानाचा आवाज दाबला जात आहे. लोकशाही आता उरली नाही. आता राज्याचे दोन जम्बो कॅबीनेट बसलेत, त्यात खरा आणि खोटा मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही. कारण, सध्याच्या मुख्यमंत्री यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री बनवले आहे, हे मंत्री जनतेची सेवा कमी आणि दिल्लीवारी करण्यात मग्न आहे. ६ वेळा त्यांनी जनतेसाठी नाही तर स्वार्थासाठी दिल्लीवारी केली असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या सर्व बंडखोरांना लगावला आहे.रा
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या माफीनाम्यात म्हणाले की, दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली.
महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.
गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.
परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही.
महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.