मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडे केले, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बंडानंतर पहिल्यांदाच जाहीर मुलाखत दिली आहे. ही मुलाखत दै. सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेत याअगोदरही फूट पडली होती. छगन भुजबळ, नारायण राणे हेही शिवसेनतून बाहेर पडले होते. पण शिवसेनेत त्यावेळी एवढी मोठी फूट पडली नव्हती. या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, शिवसेनेत मी ज्यांना अधिकार दिले होते, त्यांनीच माझा विश्वासघात केला. त्यावेळी लोक माझ्या तोंडावर बोलत नव्हते, पण मला कुजबूज ऐकू यायची की, काय हे मुख्यमंत्री आहेत.
नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे असायला पाहिजे. मलईदार खातं आहे म्हणतात. पण मी ते खातं माझ्याकडे न ठेवता विश्वासाने त्यांच्याकडे सोपवलं होतं. मी मलई बिलई खाण्यासाठी गेलो नव्हतो. मी माझ्याकडे जी खाती ठेवली होती ती एक म्हणजे सामान्य प्रशासन, दुसरे न्याय व विधी. होय, आयटीही ठेवलं, कारण खरंच या तंत्रज्ञानाचा उपयोग सगळ्या खात्यांसाठी काहीतरी करता येईल का? हा माझा विचार होता, असंही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
माझी तब्येत बिघडली होती, तेव्हा मोठ्या संख्येने लोक त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना आणि अभिषेक करत होते. पण असे काही लोक होते जे अगदी उलट इच्छा करत होते. मी उभा राहू शकत नव्हतो, याचा काहींना आनंद झाला होता. माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या," असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.