
मुंबई: राज्यसभेच्या ६ जागांसाठीचं मतदान काल (शुक्रवारी) पार पडलं. भाजपने यात तिसरा उमेदवार दिल्याने राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात होते त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. या निवडणुकीचा (Election 2022) निकाल शनिवारी मध्यरात्री लागला. या निकालाबाबत शिवसेना नेते आणि विजयी उमेदवार संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (ShivSena Leader Sanjay Raut Got Angry On Independent MLA's After Loose Maharashtra Rajya Sabha Election 2022)
हे देखील पाहा -
संजय राऊत म्हणाले की, आमचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही, मी पराभूत नाही म्हणणार विजयी होऊ शकला नाही असं मी म्हणेन. राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया खूपच किचकट आहे. ज्या कारणासाठी आमचं एक मत बाद केलं, तशाच प्रकारच्या काही मतांवर आम्ही आक्षेप घेतला होता. तशीच चुक समोरच्यांनी केली होती. पण निवडणूक आयोगाने त्यांची मतं बाद केली नाही. आमचं मत मात्र बाद केलं. शेवटी या देशातल्या केंद्रीय यंत्रणा या केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाच्या दबावाखाली कशाप्रकारे काम करतात हे आम्ही काल डोळ्यांनी बघितलं. ईडी, सीबीआय आणि अशा प्रकारच्या संस्था वापरल्या जातात का? अशी शंका येते असं म्हणत राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
पुढे राऊत म्हणाले की, आमचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. काही जे घोडे जे बाजारातले होते ते विकले गेले. ते घोडे बाजारात होते, जास्त बोली लागली असं मला वाटतं. यामुळे अपक्षांची ६-७ मतं आम्हाला मिळाली नाही. ते (अपक्ष) कुणाचेच नसतात. पण आमचे घटक पक्ष जे आहेत त्यातलं एकही मत फुटलं नाही. ती सगळी मतं आम्हाला मिळाली आहेत. फक्त बाजारात घोडे बाजारात जे लोक उभे होते त्यांची ६-७ मतं आम्हाला मिळू शकली नाही. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही, आम्ही व्यापार केला नाही. ज्याने कुणी शब्द देऊनही दगाबाजी केली आहे, त्याची यादी आमच्याकडे आहे. त्यांची नावं आमच्याकडे आहेत. आम्हाला माहिती आहे कुणी आम्हाला मत दिलं नाही. पण ठिक आहे पाहूयात असा सूचक इशारा त्यांनी अपक्ष आमदारांना दिला आहे.
संजय राऊत म्हणाले की, सुहास कांदे यांचं मत नक्की का बाद केलं आणि कोणत्या कारणासाठी बाद केलं हा संशोधनाचा विषय आहे. सुहास कांदे यांचं मत ज्या कारणासाठी बाद झालं त्याच कारणासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या मताला आम्ही आक्षेप घेतला. मतदान करत असताना धार्मिक प्रदर्शन करायचं नसतं करी अमरावतीचे काही शहाणे जे काही करत होते त्यांचंही मत घटनेनुसार बाद व्हायला हवं होतं. पण फक्त आमचं मत बाद करण्यात आलं असा आरोप त्यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना राऊत म्हणाले, हे जे काही करण्यात आलं ते रात्री उशीरा ते हे सर्व पहाटेपर्यंत सुरू होतं. यांना पहाटेची फार सवय आहे पापकृत्य करण्याची. यांचा पहाटेपर्यंत जो उपक्रम सुरू होता, त्यांच्या त्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा. तुम्ही असेच उपक्रम करत राहा आणि महाराष्ट्राचा कायमचा एकदा घोडेबाजार करुन टाका असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
मविआला मत न दिलेल्या अपक्ष आमदारांबाबत राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले मला देखील पाडण्याचा डाव होता, पण भाजपला ते शक्य झालं नाही. मी फक्त पक्षाने दिलेल्या ४२ मतांवर खेळलो. महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. घोडेबाजारतल्या घोड्यामुंळे सरकारला धोका नाही. ते घोडे आहेत, हरभरे टाकू तिकडे ते जातात. तुम्ही फार हरभऱ्याच्या झाड चढवू नका. हरभरे काही अपक्षांनी खाल्ले आहेत असं राऊत म्हणाले.
मी काय बोलावं? ते छत्रपती आहेत असं म्हणात त्यांनी संभाजीराजेबद्दल त्यांनी बोलणं टाळलं आहे. पुढे ते म्हणाले की, समोरच्या पक्षाने दिल्लीतली ताकद वापरून जे काही केलं त्याची नोंद ठाकरे सरकारने आणि जनतेने घेतली आहे. यांनी महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासला. तुम्ही काही दिवस जल्लोष करा. शिवसेनेवर टीका करा. घोजेबाजारात विकले गेले त्यांची नोंद झाली आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.